Saturday, December 27, 2008

बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न


"तहान' पाणी प्रश्‍न सोडवण्याची...

पाणी हाच धर्म... हे संत गाडगेबाबांचं ब्रीद शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणारी मंडळी विसरली आहेत की काय, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती नक्कीच आहे. निदान महाराष्ट्राच्या काही भागात तरी आहे. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. भारनियमनाची बोंबाबोंब तर सगळीकडेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी आत्महत्यांचं लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही पसरलंय. आबांच्या "सो कॉल्ड' कडक शासनानंतरही सावकारीचा पाश कायम आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्यावरुन दलित-सवर्ण वाद धगधगतोय. पाण्याच्या खासगीकरणाचा मुद्दा येत्या काही वर्षांत वादग्रस्त बनण्याची चिन्हे आहेत. पण या सर्व परिस्थितीकडे माध्यमांचं विशेषतः चित्रपट माध्यमवाल्यांचं फार कमी लक्ष जातं.

मुळातच या विषयात काही सनसनाटी नाही. शहरी मध्यमवर्गाला आकर्षून घेण्याजोगा हा विषय नाही. शहरी मध्यमवर्गानं पाठ फिरवणं म्हणजे चित्रपट आपटण्याची हमखास हमी. त्यामुळं अशा गंभीर आणि धगधगत्या वास्तवाकडे वळण्याचं धाडस कोणी करताना दिसत नाही. पण हा किचकट आणि चित्रपटासाठी कंटाळवाणा ठरु शकणारा विषय हाताळण्याचं धाडस एका दिग्दर्शकानं केलंय. महाराष्ट्रातली समस्या मांडणारा हा माणूस मराठी नाही. हा माणूस आहे बंगाली. दासबाबू असं त्याचं नाव. गेली अनेक वर्षे दासबाबू यांनी "दूरदर्शन'साठी काम केलंय. "हे बंध रेशमांचे', "एक धागा सुखाचा', "वाजवा रे वाजवा' आणि "श्रीमंताची लेक' असे अनेक चित्रपट-मालिका दासबाबू यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.

दासबाबूंचा "अशी ही तहान' हा चित्रपट सांगली आणि सातारापाठोपाठ आता मुंबईत प्रदर्शित झालाय. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुनील बर्वे, अश्‍विनी एकबोटे, विजय चव्हाण, कुलदीप पवार अशी स्टार कास्ट आहे. विषय चांगला आहे. पण विविध शहरांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अनेक अडचणी आहेत. चित्रपटगृह हा चित्रपट लावून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं या चित्रपटातून मला फार काही पैसा मिळणार नाहीये. पण मी झगडतोय ते शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी. आत्महत्या न करता समस्यांच्या विरोधात पेटून उठा, असा संदेश देण्याचा प्रयत्न दासबाबू "तहान'च्या माध्यमातून करताहेत. मुळात म्हणजे एका बंगाली माणसानं हा विषय हाताळला हीच गोष्ट कौतुकास्पद आणि काहीशी आश्‍चर्यकारक आहे. हा चित्रपट पाहताना तेलुगू चित्रपटांची आठवण येते. जमिनीच्या मुद्‌द्‌यावरुन शेतकऱ्यांना छळणारा सावकार किंवा जमीनदारांच्या विरोधात उभी राहणारी आंदोलनं हे विषयही तिथं चित्रपटात दिसायचे. त्याचीच आठवण "तहान' पाहताना होते.

किशोर नांदलस्करला कर्जासाठी छळणारा सावकार, दलित असल्यामुळे अश्‍विनी एकबोटेला घरच्या विहिरीवर पाणी भरु न देणारी सावकाराची बायको, एक घागर पाण्यासाठी अश्‍विनी एकबोटेला आपल्याबरोबर शय्यासोबत करायला लावणारा सावकार (शरद समेळ), नदीचं खासगीकरण करुन गावकऱ्यांना पाण्याला मोताद करणारं सरकार, "फिल्टर वॉटर'च्या कंपनीला नदी विकणारे आणि त्या कंपनीमध्ये भागीदारी करणारे मुख्यमंत्री असे अनेक प्रसंग वास्तवाची दाहकता दाखवून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी कसं राजकारण होतं, सरकार किंवा मंत्री जनतेची आणि पत्रकारांची कशी फसवणूक करतात हे अगदी योग्य रितीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लोकसत्ताचे पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. त्यामुळे ते "दोन फुल एक हाफ' इतकेच दर्जेदार आहेत. जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी (आणि एका लावणीनं...) चित्रपटात धमाल आणलीय. चित्रपटातली तीन गाणी पाणी या विषयाभोवतीच आहेत. "टाकी तुडुंब भरा...' अशी लावणी दिलखेच आहे.

ही "राजकीय फॅंटसी' आहे, असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यामध्ये कथा कशीही वळवली तरी ते विचित्र वाटत नाही. प्रत्यक्षात अनपेक्षित वाटणारे अनेक प्रसंग आणि घटना या चित्रपटामध्ये अगदी जोर देऊन चित्रित केले आहेत. शिवाय चित्रपटाचा वेग मंदावला आहे. हल्लीच्या वेगवान दुनियेत हा चित्रपट वेगाच्या दृष्टीनं म्हणजे "दूरदर्शन'च्या जुन्या काळातली "डॉक्‍युमेन्ट्री'च म्हटली पाहिजे. पण तरीही हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. शहरी भागामध्ये पाण्याची समस्या इतकी जाणवत नाही. पण आपण जसजसं ग्रामीण भागात जातो तसतशी आपल्याला ही समस्या जाणवू लागते. त्यामुळंच ग्रामीण भागात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. समस्या आहे ती चित्रपटाला चित्रपटगृह मिळतील किंवा कसे याचीच. दासबाबू हे यासाठी प्रयत्नशील आहेत.

दासबाबू
(दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक एमटीएनएल)
9869011212 आणि 9869281212
dasbabu_director@rediffmail.com

Monday, December 08, 2008

शूरा मी वंदिले...


माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु... जिंकू किंवा मरु... अनेक वर्ष फक्त टीव्ही वर पाहिलेलं हे समरगीत... या गीताचा प्रत्यक्ष अनुभव आला तो अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतरच... प्रत्यक्षात पुढं मृत्यू उभा ठाकल्यानंतरही निधड्या छातीनं फक्त आणि फक्त देशासाठी प्राण देण्याची तयारी म्हणजे काय हे मुंबईवरच्या हल्ल्यामुळं अगदी जवळनं अनुभवता आलं. मृत्युच्या गुहेत शिरुन मृत्यूचाच खातमा करणं प्रचंड अवघड, थरारक आणि जिगरीचं काम... पण एनएसजी कमांडो, लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस हे काम जीवावर उदार होऊन करत होते. अगदी दिवस-रात्र... तब्बल सलग सत्तावन्न तास...

अतिरेक्‍यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र सामुग्री नसेलही... पण आहे त्या शस्त्रांनिशी लढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चा आता खूप होतील. पण तक्रार न करता आहे त्या शस्त्रांनिशी युद्धभूमीवर जायला आणि शत्रूचा सामना करायला अंगात धमक लागते. ती महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना सलाम.

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांनी आधी पूर्ण माहिती घेऊन नंतरच मैदानात उतरायला हवं होतं, असा सूर आता ऐकू येतोय. पण प्रतापराव गुजरांच्या या महाराष्ट्रात शत्रूला संपवण्यासाठी वेडात हे तीन वीर दौडले त्यांचा पराक्रम अगदी बिनतोड... संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर फिल्मी मंडळींसह टूर काढायला पोलिस म्हणजे काही राजकारणी नाहीत. माझ्या मुंबईत काही तरी विपरित घडलंय आणि मला ते थांबवायचंय. त्यासाठी मला तातडीनं घटनास्थळी गेलंच पाहिजे, हेच अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात होतं. हे प्रकरण आपल्या जीवावर बेतू शकेल, याचा अंदाज त्यांना कदाचित असेलही. पण असं असतानाही तातडीनं "फिल्ड'वर येऊन प्राणांची आहुती देणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या या तीन सरदारांना सलाम.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी आगीची धग तर नेहमीचीच. पण दहशतवादाची धग ते प्रथमच अनुभवत होते. युद्धभूमीप्रमाणे गोळीबार सुरु आहे. ग्रेनेड हल्ले होत होते. पण तरीही हॉटेलचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि लागलेली आग तातडीनं विझवायचीय हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. त्यासाठी ते प्राणांची बाजी लावत होते. गोळीबार सुरु असताना ताजला लागलेली आग विझवण्यासाठी झटत होते. आपलं मरण डोळ्यासमोर असतानाही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम.

अतिरेक्‍यांना संपवून टाकण्यासाठी युद्ध सुरु होतं. हे युद्ध कव्हर करण्यासाठी काही अतिउत्साही पत्रकारही आले होते. तसंच काही नागरिक क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येतात तसे ही लढाई पाहण्यासाठी आले होते. ही बघ्यांची गर्दी आवरण्याचं काम शीघ्र कृती दलाचे जवान, महाराष्ट्र पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची होती. नेमून दिलेलं काम चोख पार पाडून ऑपरेशला मदत करणाऱ्या या सर्वांना सलाम.

राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजीचे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या अभिनंदनासाठी तर शब्दच अपुरे पडतील, अशी परिस्थिती आहे. अतिरेक्‍यांना कंठस्नान घालून त्यांनी मुंबईकरांसह सर्व भारतीयांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिलीच. पण हे करताना हॉटेलमधल्या बंधकांना सोडविण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. अतिरेक्‍यांचा खातमा करताना एकाही नागरिकाचा प्राण जाणार नाही, याची काळजी जवानांनी घेतली.

स्वातंत्रपूर्व काळात क्रांतिकारक जसे हातावर प्राण घेऊन इंग्रजांशी लढायचे. तशाच पद्धतीनं आधुनिक काळातले हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु लढत होते. कुणासाठी फक्त देशासाठी... हल्ली देशासाठी काहीतरी करण्याची बोल बच्चनगिरी करणारे पुष्कळ आहेत. पण प्रत्यक्ष कृती करणारे अगदी थोडे. त्या यादीत लष्कराचे जवान किंवा एनएसजीचे कमांडो यांचं स्थान अगदी वरचं. ही यादी त्यांच्यापासूनच सुरु होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच कमांडो आणि जवानांना त्रिवार नव्हे, शतशः नव्हे, लाखो नव्हे अगदी अनंत अगणित सलाम.

अतिरेकी कितीही असो... आम्हाला कोणतंही काम अवघड नाही... जोपर्यंत एनएसजी आहे तोपर्यंत भारताकडे कोणीही वाकडा डोळा करुन पाहू शकत नाही, असं सांगणाऱ्या एनएसजी कमांडोजच्या आत्मविश्‍वासाला सलाम. सारं करुनही आपण काहीच न केल्याच्या आर्विभावात वावरणाऱ्या लष्करी जवानांच्या निरपेक्ष वृत्तीला सलाम. ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर प्रेमानं दिलेलं गुलाबाचं फुल स्वीकारण्यासाठी शंभरदा विचार करणाऱ्या जवानांच्या निस्वार्थी हेतूंना सलाम. काळ्या कपड्यात राहूनही पांढऱ्या कपड्यांमधल्या बगळ्यांपेक्षा अधिक स्वच्छ आणि शुद्ध असलेल्या जवानांच्या खऱ्याखुऱ्या देशभक्तीला सलाम. अतिरेक्‍यांशी लढण्यात इस्रायलचे जवान सर्वाधिक पटाईत. अशा इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या एनएसजी कमांडोजच्या शौर्याला आणि लढवय्या वृत्तीला सलाम.

अतिरेक्‍यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सलाम, जखमींना रुग्णालयात नेऊन माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणाऱ्या मुंबईकरांना सलाम, जखमी रुग्णांवर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसंच परिचारकांना सलाम, हल्ला झाल्यानंतर रक्तदानासाठी तातडीनं ब्लड बॅंक गाठणाऱ्या रक्तदात्यांना सलाम, दक्ष मुंबईकरांना सलाम, युद्धजन्य परिस्थितीतही प्रेक्षकांपर्यंत सर्व माहिती पोचवणाऱ्या पत्रकारांना सलाम, काही न्यूज चॅनेल्सच अफवा पसरवत होती. पण तरीही या अफवांवर विश्‍वास न ठेवणाऱ्या आणि स्वतः अफवा न पसरवणाऱ्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सलाम...

प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...


अनुभवला थरार दहशतवादाचा ...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं सारं जग हादरलं. भारत तर पुरता कोलमडून गेला. अशा पद्धतीनं हल्ला होईल, अशी अपेक्षाही कोणाला नव्हती. गुप्तचर संस्था आणि सुरक्षा रक्षकांचं अपयश किती महाग पडू शकतं, याचा अनुभव भारतानं घेतला. भारताची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अतिरेक्‍यांनी केलेला अंदाधुद गोळीबार, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय तसंच हॉटेल ताज इथं सुरु असलेली कारवाई चक्रावून टाकणारी होती.

मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी पुण्यात होतो. माझी सुटी संपत असल्यानं दुसऱ्या दिवशी बेलापूरला जायचं होतं. त्यानुसार मी 27 नोव्हेंबरला सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बेलापूरला पोचलो. पण ही कारवाई संपण्याचं नाव घेईना. मी येण्यापूर्वी संपूर्ण रात्र आमच्या टीमनं तासातासाला अपडेट बुलेटिन काढली होती. तसंच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोईसुविधा असतानाही आम्ही झगडत होतो. बेलापूरला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस "डेस्क'वरच होतो. संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा असं साडेचार तास "लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक मुलाखती आणि इतर बातम्या मागावून घेतल्या. तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचे फोनो आणि अधूम मधून अँकरमध्ये डिस्कशन अशापद्धतीनं साडेचार तास अक्षरशः खेचून काढलं. पण मजा आली. अशा पद्धतीनं काहीही तयारी नसताना प्रथमच इतक्‍या मोठी "रिस्क' आम्ही घेतली होती. पण तरीही वेळ मारुन नेली.

रात्रभरात कारवाई संपेल आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं आमचे वार्ताहर सांगत होते. त्यामुळं मी रात्री ऑफिसमध्येच थांबलो होतो. कदाचित ऐनवेळी रात्री विशेष बातमीपत्र काढावं लागलं असतं. त्यामुळं मी ऑफिसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पण तसं झालंच नाही आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 28 तारखेलाही हे रण सुरुच होतं. मुंबईमध्ये चकमक सुरु आहे आणि मी तिथं जाऊ शकत नाही, हे माझ्या मनाला खटकत होतं. यावेळी मला ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचं एक वाक्‍य आठवतं. जगात जिथे जिथे काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडत असतील तिथं बातमीदार म्हणून मला जावंसं वाटतं, असं गडकरी म्हणायचे. ही गोष्ट कायम माझ्या मनात असते. त्यामुळंच मी परवानगी घेऊन मुंबईत रिर्पोंटिगसाठी गेलो.

प्रथम आनंद गायकवाड याच्यासह नरिमन हाऊस इथं जाऊन तिथं परिस्थिती कशी आहे, हे पाहून आलो. तिथली कारवाई सर्वाधिक अवघड होती. नरिमन हाऊस हे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांच्या वसाहतीमध्ये वसलेले आहे. त्यामुळं तिथं कारवाई सुरु असताना नागरिक क्रिकेटच्या मॅचला जमतात तसे जमले होते. शिवाय काही अतिउत्साही पत्रकार "लाईव्ह'चा थरार अनुभवण्यासाठी पुढे पुढे करत होते. इथली कारवाई लवकर संपेल, असं चित्र होतं. तसंच तिथं आनंद असल्यामुलं मी ताज इथं "रिर्पोटिंग'साठी गेलो. तिथं साधारण रात्री साडेसातच्या सुमारास पोचलो. तेव्हापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत अनुभवला थरार, थरार आणि फक्त थरार.

""माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु, जिंकू किंवा मरू...'' हे समरगीत मी फक्त ऐकलं किंवा पाहिलं होतं. ते अनुभवण्याची संधी मला त्या रात्री मिळाली. आपण जणू काही दिवाळीतल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकतोय, अशा पद्धतीनं गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु होते. रात्री बारा ते साडेतीन या कालावधीत सारं कसं शांत शांत होतं. त्यानंतर मात्र, पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाली. मध्यरात्रीनंतर चकमक थांबली असली तरी पत्रकारांचे गोळीबार सुरुच होते. एका पत्रकारानं तर फोनो देताना अकलेचे तारेच तोडले होते. ""ताजमध्ये सहा अतिरेकी आहेत. त्यापैकी दोन महिला अतिरेकी आहेत. त्यांनी नुकतंच रात्रीचं जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा ते चकमक करण्यासाठी सज्ज झाले आहेत...'' अशी बडबड ऐकल्यानंतर मला तर सुन्न व्हायला झालं. मुळात संबंधित पत्रकाराला ही माहिती दिली कोणी आणि इतकी "डिटेल' माहिती याच्याकडे असेल तर मग त्याला गुप्तचर खात्यातच नोकरी दिली पाहिजे, असा विचार माझ्या मनाला शिवला. पण अशी फेकचंदगिरी करणाऱ्या पत्रकाराला जोड्यानं का मारु नये, असंही मला वाटलं.

शायना एन. सी. नामक भाजपची एक चकमो नेता आहे. ती लग्नाला आल्यासारखी "गेट वे ऑफ इंडिया'जवळ आली होती, रात्री दीड वाजता. आपला कोणी बाईट घेईल किंवा मुलाखत घेईल का, याचा अंदाज शायना एन. सी. घेत होत्या. पण त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं. अखेर "लाईव्ह इंडिया' नामक वाहिनी तिच्या चमकोगिरीला बळी पडली आणि वाहिद खान नावाच्या अतिउत्साही पत्रकारानं तिची मुलाखत घेतली, अवघी पंधरा मिनिटं. ऍलेक पद्‌मसी हे ऍड विश्‍वातलं हे नामांकित व्यक्तिमत्व. हे महाशय पण रात्री अडीचच्या सुमारास तिथं आले. "बीबीसी'च्या एका पत्रकाराक डून त्यांनी आधी माहिती घेतली आणि मग तीच माहिती दुसऱ्या एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितली. त्यामुळं या महाशयांचे टीव्ही प्रेमही उघड झाले. हवशे, नवशे आणि गवशे असे असंख्य नागरिक-पत्रकार तिथं होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास चकमक पुन्हा सुरु झाली आणि आता ती वेगानं सुरु होती. अतिरेक्‍यांची एखादी गोळी आपल्या दिशेनं येऊ नये किंवा ग्रेनेडचे तुकडे फुटून आपल्या अंगावर येऊ नयेत, अशी प्रार्थना करुन आम्ही तिथं थांबलो होतो. माझ्या परिस्थितीवरुन तिथं लढणारे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या धैर्याची कल्पना मला येत होती. त्यामुळंच त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, अशी माझी भावना आहे. सकाळी सकाळी म्हणजे साडेसातच्या सुमारास ही चकमक अंतिम टप्प्यात असल्याचं जाणवलं. कारण गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांचा वेग वाढला होता. ताजच्या डाव्या कोपऱ्यातल्या तळ मजल्याला आगा लागली. ती प्रचंड वेगानं पसरत होती. पहिल्या मजल्याचा काही भागही आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. ही आग अतिरेक्‍यांनीच लावली, असा आमचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र, ही आग लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करुन लावली होती. पण तेव्हा साधारण अंदाज आला होता की, ही चकमक काही मिनिटांतच संपुष्टात येणार आहे. झालंही तसंच. साडेआठ पावणे नवाच्या सुमारास सारं काही शांत शांत झालं. एक व्यक्ती ताज हॉटेलच्या खिडकीतनं बाहेर पडताना सगळ्यांना दिसला. तोच ताजमधला शेवटचा अतिरेकी आणि त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं होतं.

त्यानंतर जवान आणि कमांडो अगदी रिलॅक्‍स दिसत होते. अग्निशामक दलाचे जवानही अगदी बिनधास्तपणे आग विझवत होते. शिवाय ज्या पहिल्या आणि तळ मजल्यावर संघर्ष सुरु होता, तिथं आता जवानांनी ताबा मिळवला होता. त्यामुळं कारवाई स्पष्ट झाल्याचं जाणवतं होतं. हो कारवाई संपलीच होती. कारवाई पार पडल्यानंतर विश्रांती घेत असलेल्या एका "एनएसजी' कमांडोशी गप्पा मारत असताना त्यांच्यातल्या आत्मविश्‍वाचा प्रत्यय आला. ही कारवाई थोडी अवघड होती, असं नाही वाटत का? या माझ्या प्रश्‍नावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. "एनएसजी'साठी कोणतीच कारवाई अवघड नाही. आम्ही कोणाचाही सामना करु शकतो आणि देश वाचवू शकतो. हे अतिरेकी अद्ययावत आणि फिट होते, त्यामुळं आम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागला. पण अखेरीस ते संपलेच. आम्ही कोणापुढेही हार पत्करत नाही... असं त्या कमांडोनं सांगितल्यानंतर मला धन्य झाल्यासारखं वाटलं.

Monday, November 17, 2008

उसळ आणि शिकरणीचे दिवस संपले...


पुणेकरांची बदलती खाद्यसंस्कृती...
करा लेको, खा खा मटार उसळ खा, शिकरण खा... पुणेकरांची चैनीची सीमा म्हणजे मटार उसळ आणि शिकरण... मराठी साहित्य विश्‍वाचं अविभाज्य अंग असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या "तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर... ' या सुप्रसिद्ध प्रकरणातील हा एक अप्रतिम उतारा. पुणेकरांच्या संकुचित खाद्य संस्कृतीवर अगदी परखडपणे ताशेरे ओढतो.

पण आता काळ बदललाय. पु.लं.च्याच भाषेत बोलायचं झालं तर "पूर्वीचं पुणं राहिलं नाही...' एकेकाळी मटार उसळ, मटार पॅटिस आणि शिकरणापर्यंतच मर्यादित असलेल्या पुण्याच्या खाद्य संस्कृतीचं ताट आता विस्तारलंय. त्यामध्ये नवनव्या पदार्थ समाविष्ट होत आहेत आणि अर्थातच, खवय्येगिरीत आघाडीवर असलेल्या पुणेकरांनी या पदार्थांचा अगदी आपुलकीनं स्वीकार केलाय.

सक्काळी सक्काळी न्याहारीसाठी बेडेकर, श्री, संजीवनी, बेहेरे किंवा श्रीकृष्ण इथली मिसळ अक्षरशः ओरपायची. लक्ष्मी रस्त्यावर काकाकुवा मॅन्शन किंवा बाजीराव रस्त्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इथं गरमागरम पोहे, उप्पीट किंवा झणझणीत चटणीसह वडा खायचा. अमृततुल्यात जाऊन फक्कड चहा प्यायचा, हा खवय्यांचा हमखास ठरलेला बेत.

तुम्हाला दाक्षिणात्य नाश्‍ता करायचाय तर मग थेट रास्ता पेठेतलं केईएम हॉस्पिटल गाठायचं. तिथं समोरच अण्णांच्या अनेक गाड्या दिसतील. त्यामध्ये इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, अप्पम्‌ आणि टेस्टी सांबार-इडली यांच्या जोडीनं मैफल जमते. जंगली महाराज रस्त्यावरच्या वैशाली आणि रुपालीचा रुबाब थोडा जास्त. त्यामुळं तिथं "व्हाईट कॉलर' खवय्ये अधिक असतात. कुरकुरीत डोसा किंवा वाफाळलेली इडली आणि मग कडक कॉफी ही इथं दिली जाणारी हमखास ऑर्डर. बाजीराव रस्त्यावरच्या वाडेश्‍वरमधली इडली चटणी पण चटकदार. तिथं मिळणारा आलू पराठा देखील टेस्ट करायला हरकत नाही. पण आता जमाना आहे "स्पेशलायझेशन'चा. त्यामुळं फक्त डोसाची ऑर्डर पुरवणारे "डोसा प्लाझा' उभे राहताहेत. तिथं डोशाच्या एकशेदहापेक्षा अधिक "व्हरायटी' आहेत.

थोडं निवांत असाल तर मग कॅम्पातलं नाझ किंवा महानाझ, डेक्कनवरचं लक्की अथवा गुडलकमध्ये जायचं. थेट ऑम्लेट पाव किंवा बन मस्काची ऑर्डर द्यायची. "इराणी रेस्तरॉं'मध्ये जाल तर इराणी सामोशाची ऑर्डर द्याच. एका प्लेटमध्ये आठ-दहा सामोसे आणि सोबतीला भोपळ्याचा सॉस तुमच्यासमोर येईल. खायचे तितके सामोसे खा. हे वैविध्य झालं न्याहारीचं. आणि हो, तुम्ही कोठेही गेलात तरी गर्दी असणारंच. त्यामुळं थोडासा वेळ घेऊनच जा.

कधी काळी सतपोतदारांचं पूना गेस्ट हाऊस, पेरुगेटजवळचं पूना बोर्डिंग, बादशाही बोर्डिंग हाऊस, प्रभात रस्त्यावरचं सुवर्णरेखा, डेक्कनवरचं जनसेवा किंवा आपटे रस्त्यावरचं आशा डायनिंग हॉल अशा अगदी मर्यादित खानावळी होत्या. खानावळीच म्हटलं पाहिजे. अगदी घरगुती पद्धतीचं आणि घरच्या चवीचं जेवण इथं मिळायचं. मग बाहेर जेवायला जायचं (शक्‍यतो रविवारी सकाळी) म्हणजे इथं कुठंतरी जायचं, असा नेम ठरलेला असायचा. ज्या पुणेकरांच्या खिशात जास्तच पैसा खुळखुळायचा ती मंडळी आपटे रस्त्यावरच्या श्रेयसमध्ये जायची.

हळूहळू काळ बदलत गेला आणि महाराष्ट्रीय किंवा थाळी पद्धतीच्या जेवणाला अनेक पर्याय निर्माण होऊ लागले. एव्हाना गिरीजा किंवा जयश्री पावभाजीची धूम निर्माण झाली होती. गिरीजा किंवा जयश्रीमध्ये जाऊन खायचं हे प्रेस्टिजियस असायचं. कुुटुंबातल्या सर्वांनी एकत्र जायचं तर मग म्हात्रे पुलाजवळचं स्वीकार किंवा जंगली महाराज रस्त्यावरचं पांचाली यांची निवड व्हायची. तिथं "राईस प्लेट'प्रमाणेच साऊथ इंडियन आणि पंजाबीतल्या डिशेस मिळायच्या. औंधजवळचं सर्जा, बालगंधर्वजवळचं गंधर्व, बाजीराव रस्त्यावरचं गणराज आणि अशी असंख्य "मल्टिक्‍युझीन रेस्तरॉं' एव्हाना सुरु झाली होती.

पण जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये हॉटेलमध्ये जाणं ही चैनीची गोष्ट राहिली नाही. ती एक गरज बनली. त्यामुळं दर शनिवारी आणि रविवारची संध्याकाळी बाहेरच जेवायाला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळं "रेस्तरॉं'ची संख्याही तिपटी चौपटीनं वाढली व खाद्यपदार्थांमध्येही "व्हरायटी' मिळू लागल्या. "रेस्तरॉं' खऱ्या अर्थानं "मल्टिक्‍युसीन' झाली.

अंडाभुर्जीच्या गाड्यांप्रमाणेच एव्हाना चायनीच्या गाड्या रस्त्यांवर दाखल झाल्या होत्या. टपरी वजा हॉटेल्सलाही सुरवात झाली होती. पण तिथं सहकुटुंब जाणं थोडंसं धाडसाचं असायचं. त्यामुळं फक्त चायनीज खाद्यपदार्थांना वाहिलेली "रेस्तरॉं' सुरु झाली. एफसी रोडवरचं हाका, जंगली महाराज रस्त्यावरचं फॅट कॉंग आणि चायनागेट सारखी असंख्य "चायनीज रेस्तरॉं' सुरु झाली. साऊथ इंडियन किंवा महाराष्ट्रीय "रेस्तरॉं'मधून पंजाबी डिशेस मिळायच्या. पण फक्त पंजाबी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोंढवा किंवा विमाननगर परिसरात असलेलं "देव अंकल्स किचन', नगर रस्त्यावरचं "नॉदर्न फ्रंटियर' व बाणेरमधलं राजवाडा किंवा सर्जा अशी विशेष पंजाबी "रेस्तरॉं' दिमाखात सुरु झाली. अनेक पराठा हाऊसही दमदार व्यवसाय करु लागली.

पण पुणेकरांच्या आवडीनिवडी सातासमुद्रापार गेल्या आणि परदेशातल्या खाद्यपदार्थांनाही पुणेकरांनी आपलसं केलं. मेक्‍सिकन, कॉन्टिनेन्टल, मलेशियन, थाई, इटालियन, लेबनीज आणि अशा असंख्य देशांमधलं खाद्यजीवन पुण्यात बहरत गेलं. औंधमधलं "पोल्का डॉट्‌स', मुकुंदनगरमधलं "मारी गोल्ड' किंवा कर्वे रस्त्यावरचं "ऑफ बिट' ही अशाच काही "रेस्तरॉं'ची उदाहरणं. "इटालियन पिझ्झा आणि पास्ता'ची फर्माईश द्यायची असेल तर तशीही सुविधा कोरेगाव पार्क किंवा कॅम्प भागात उपलब्ध आहे.

शाकाहारी प्रमाणेच मांसाहारी खवय्यांचीही पुण्यात चैन आहे. पूर्वीची "जय भवानी' नावानं साखळी खानावळ प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर सातव बंधूंची "कावेरी हॉटेल्स'ची साखळी उघडण्यात आलीय. तसंच जोंधळे चौकातली आवारे खानावळ शंभर वर्षांपासून चव टिकवून आहे. आता तर या खानावळीचं रुप पुरतं पालटलंय. सदाशिव पेठेतल्या "त्या' सुप्रसिद्ध गल्लीचं रुपही आता पालटलंय. गोपी, आशीर्वाद आणि दुर्गा यांना साथ मिळतेय ती "सृष्टी'च्या "सी फूड'ची तसंच "पुरेपूर कोल्हापूर'सारख्या झणझणीत ठिय्यांची. मांसाहारी "रेस्तरॉं'ची संख्या इतकी वाढलीय की, विचारता सोय नाही. मग नळस्टॉपजवळचं "निसर्ग', लाल देवळाजवळचं "महेश लंच होम' किंवा कर्वे रस्त्यावरचं "कवी' अशी खास फिश फेव्हरेट "रेस्तरॉं' सुरु झाली आणि बहरलीही. ठिकठिकाणी छोटे-छोटे मालवणी अड्डे सुरु झाले. तिरंगासारखं फक्त "बिर्याणी'साठी ओळखलं जाणारं "रेस्तरॉं' सुरु झालं.

सारसबागेत, संभाजी बागेत किंवा शनवारवाड्याजवळ गाड्यांवर मिळणारी भेळ तसंच पाणीपुरी आता कॉर्पोरेट झालीय. एसएनडीटीजवळ किंवा कात्रज-कोंढवा रस्त्यावर "कल्याण' नावानं भेळेचं दुकानंच थाटण्यात आलंय. तिथं अगदी प्लॅस्टिकचे हातमोजे वगैरे घालून भेळ तयार होतेय. इतर काही ठिकाणी बिसलेरीच्या पाण्यापास्नं पाणीपुरी केली जाते. इतकी खबरदारी घेतली जात असल्यामुळं इतरवेळी नाकं मुरडणारी मंडळीही "चाट'कडे वळताहेत.

पानाच्या टपऱ्यांमध्येही कॉर्पोरेट कल्चर आलंय. "शौकिन'सारखी दुकानं महिलांनाही पानाच्या दुकानात येण्यास प्रवृत्त करतात आणि महिलाही अगदी बिनदिक्कतपणे "एक साधा फूलचंद' असं पान अगदी सहजपणे मागू शकतात.

पुणं बदलतंय. देशभरातनंच नव्हे तर जगभरातनं लोकं व्यवसाय-शिक्षणासाठी पुण्यात येताहेत. स्थायिक होताहेत. त्यामुळं त्यांच्या खाद्यसंस्कृती पुण्यात रुजू लागलीय. पुणेकरांनीही या संस्कृतीला परकं मानलेलं नाही. कारण पुणेकर फक्त खाण्यावर प्रेम करतो. पटेल, पचेल आणि रुचेल ते खातो.

Saturday, November 15, 2008

Raj's Video about BHAIYYA...

Raj Thackrey in his recent controversial MMS clip....

Wednesday, October 29, 2008

राज यांचे राजकारण...!

निवडणुकीचे राजकारण जमणार?
पुण्यात नुकतीच राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा रंगली. स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजकांनी प्रत्येक जिल्ह्यात युथ बॅटन रिलेचं आयोजन केलं होतं. आता राज ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याराज्यात पोहोचावी म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांनी राज ठाकरे अटक बॅटन रिले आयोजित केलीय.
सुरवातीला विक्रोळी, नंतर वांद्रे, मग मानपाडा आता कल्याण आणि नंतर कदाचित जळगाव, सोलापूर, पंढरपूर ..... आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर अगदी छोटं छोटं गाव. हो कारणंच तसं आहे. राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची चढाओढ पोलिसांमध्ये लागलीय. जळगावमध्ये दहा ठिकाणी तर नाशिकमध्ये सात ठिकाणी गुन्हे नोंदले गेलेत. पुण्यातही कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला गेलाय. सोलापुरात आणि पंढरपुरात गुन्हा दाखल झालाय. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात असे गुन्हे नोंदतील. मग प्रत्येक ठिकाणीचे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी येतील आणि राज ठाकरे आणखी मोठे होतील. राज यांना आणखी मोठं करण्यासाठीच पोलिस प्रयत्नशील आहे. कदाचित त्यांना वरुन तसे आदेशही मिळाले असतील.
हो सरकारला आणि पोलिसांना राज यांना गावागावात पोहोचवायचंय. निवडणुका झाल्या तर राज्य सरकार गोत्यात येईल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनं राज्य कारभाराचा बट्ट्याबोळ केलाय. त्यामुळंच ते शिवसेनेची मतं फोडण्यासाठी राज यांना मोठं करताहेत. हे आम्ही नाही तर देशातला प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. अगदी भाजप, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षही आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनीही अशाच प्रकारचं विधान केलंय.
मराठीच्या मुद्‌द्‌यावर राज ठाकरे यांनी उभारलेलं आंदोलन योग्यच आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा जया बच्चन यांनी मराठी भाषकांचा केलेला अपमान असो. राज ठाकरे अगदी शंभर टक्के मान्य. मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या उत्तर भारतीयांना फटकावलंच पाहिजे. मग ते राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असोत, शिवसेनेचे असोत किंवा अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. राष्ट्रीय पक्षांनीही अशी भूमिका घेतली तरी कोणालाच वाईट वाटणार नाही.
सध्या तरी राज ठाकरेच आक्रमक भूमिका घेत आहेत. ती त्यांची गरज आहे, असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. म्हणजे राज यांचा मुद्याही योग्यच आहे. त्यांचा मार्गही काही प्रमाणात योग्य आहे. शिवाय राज्य सरकारचा त्याला आतून पाठिंबा आहे, अशीही चर्चा आहे. राज यांच्या आंदोलनाला हवा मिळाली तर त्याचा निवडणुकीत मनसेला फायदाच होईल. शिवसेनेची मतं फुटतील. शिवसेनेच्या मतफुटीमुळं सरकार तरुन जाईल, असे मनसुबे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधले आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांच्या बाबतीत सरकार नरमाईचं धोरण स्वीकारत होतं.
कदाचित हेच कारण असल्यामुळं सरकारनं विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना शंभरवेळा विचार केला होता. अन्‌ राज ठाकरे यांना अटक लांबवली होती. पण ठाण्यातल्या घडामोडींनंतर राज यांना पहाटे पहाटेच उचलण्यात आलं. आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदले जाताहेत. पोलिसही कधी नव्हे इतकी घाई करताहेत. इतकी तत्परता दाखवण्यात राज्य सरकारचा कोणताच छुपा हेतू नाही, यावर विश्‍वास बसणं कठीण जातंय.
राज यांचे आंदोलन त्यांच्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यांच्या पक्षाचा पायाही विस्तारला जाईल. शिवाय मराठीच्या मुद्‌द्‌यासाठी लढणारा आणखी एक शिलेदार महाराष्ट्राला मिळेल. पण राज यांच्या संघटनेसमोरचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची दुसरी फळी नाही.
शिशिर शिंदे, शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, अतुल सरपोतदार आणि दीपक पायगुडे... या पलिकडे नेत्यांची यादी जाणार नाही. शिवाय राज ठाकरे यांची पुण्यात पहिली सभा लावणाऱ्या गणेश सातपुते यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं मनसेला राम राम ठोकून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. हिंदुत्व सोडून काम करणं जमत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इतर कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ना उद्या तशीच होणारेय.
पक्षापुढे कार्यक्रम नाही, कार्यकर्ते आहेत पण नेत्यांची दुसरी फळी नाही आणि मुख्य म्हणजे सभांना गर्दी मतांमध्ये रुपांतरित होत नाही, हा बाळासाहेब यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव पाहता राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान खूप मोठे आहे. त्यांचं भवितव्य खडतर आहे. नागरिक भावनिक होऊन मतदान करत नाही. हा प्रत्यय राज आणि राणे यांना मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आलेलाच आहे.
तरुणांमध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे मुद्देही योग्य आहेत. पण तरीही पुढच्या निवडणुकीत राज यांचे भवितव्य खडतरच आहे.

Wednesday, October 15, 2008

शिवसेनेचा चेहरा बदलणारा नेता...


संघटक आणि शिस्तप्रिय कार्याध्यक्ष
ठाकरे हे आडनाव ऐकलं की, कोणत्याही मराठी माणसाचे कान टवकारणच! मग ते बाळासाहेब असोत, राज असो किंवा उद्धव. अगदी स्मिता ठाकरे हे नाव ऐकलं तरी टवकारणारे कान आहेतच. ठाकरे घराण्याबद्दल मराठी माणसाला पहिल्यापासून आकर्षण आहे. आदित्य ठाकरे एक अल्बम बाजारात आणतो आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहतो. ही आहे ठाकरे या आडनावाची जादू.

उद्धव हे नाव अगदी अलिकडेच पुढे आलेलं. नाही म्हटलं तरी पाच वर्ष झाली. महाबळेश्‍वर इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात उद्धव यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. तेव्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेला मी होतो. तेव्हापासून त्यांच्यात होत गेलेला बदल, घडत गेलेला कुशल संघटक आणि परिपक्व राजकारणी मी पाहतो आहे.

उद्धव हा कारकुनांचा नेता आहे, तो बाळासाहेबांइतका प्रभावी वक्ता नाही, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मवाळ होतेय... असे एक ना अनेक आरोप उद्धव यांच्या होत राहिले. ते राजकारणीच नाहीत, असंही काही जण म्हणत होते. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत उद्धव यांची वाटचाल सुरुच होती. नारायण राणे गेले, राजही सोडून गेला, अनेक छोटे-मोठे नेते उद्धव यांच्यावर आरोप करुन निघून जात होते. पण उद्धव त्यांच्या कार्यपद्धतीवर ठाम होते.

"फर्स्ट क्‍लास' कारकिर्द!
लागोपाठ दोन वेळा मुंबई महापालिकेवरची सत्ता अबाधित राखून त्यांनी कुशल संघटकाची आणि कार्याध्यक्षपदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. राणेंचा अश्‍वमेध रायगडमध्येच रोखून तुकाराम सुर्वे यांना विधानसभेत पोहोचविले होते. रामटेकमध्येही सुबोध मोहिते हे प्रकाश जाधव यांच्यापुढे चारी मुंड्या चीत झाले. ठाण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आख्खी राष्ट्रवादी कॉंग्रेस ठाण्यात एकवटली होती. पण तिथंही उद्धव यांची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली. राज आणि राणे बाहेर पडले तरी उद्धव यांनी हळूहळू संघटना इतकी उत्तम रितीने बांधली होती की, त्याला अधिक तडे गेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला दिशा दिली.

बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव यांच्या काळातील शिवसेना पूर्णपणे वेगळी आहे. एका अर्थानं तिला "कॉर्पोरेट लुक' आला आहे. पण दुसरीकडे तळागाळातल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी "राडा' करण्याची रगही शिवसैनिकांमध्ये आहे. ऊस, कापूस आणि भारनियमनासारख्या प्रश्‍नांवर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत हिंडणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे, झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आणि मराठीच्या फेऱ्यात अडकवून न ठेवता सर्व मुंबईकरांमध्ये शिवसेनेला नेण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळेच उद्धव यांच्या कार्यपद्धतीबद्दल, निर्णयक्षमतेबद्दल आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला आकर्षण होतं. त्यांना अगदी जवळून न्याहाळण्याची आणि मनसोक्त गप्पा मारण्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच ही इच्छा पूर्ण झाली.

"डिट्टो' कॉपी
दसरा मेळाव्याच्या निमित्तानं "साम मराठी' वाहिनीसाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घ्यायची होती. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी ही मुलाखत घेतली. पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं. शिवसेना भवनात सैनिकांचा राबता कायमच. साहेबांना भेटण्यासाठी आलेले असंख्य कार्यकर्ते. उद्धव यांचे निकटवर्तीय विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची सुरु असलेली धावपळ. अशा परिस्थितीत बाळासाहेब आणि राज यांची डिट्टो कॉपी वाटावी, अशा पद्धतीनं उद्धव यांचं आगमन झालं. आज काय, पेपरमध्ये काय वगैरे माहिती घेऊन साहेब आले. मध्येच कार्यकर्त्यांची चौकशी करुन मग मुलाखतीसाठी तयार झाले. बोला, विचारा प्रश्‍न असं म्हणून थेट सुरवात. त्यामुळे कॅमेरामन व लाटकर यांची थोडी धावपळ. माध्यमांना एकदमच किरकोळीत काढण्याची ठाकरे घराण्याची सवय उद्धव यांच्यामध्येही दिसून येते.

उद्धव यांच्या मुलाखतीमध्ये जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे आपल्यात काय कमी आहे, याची उद्धव यांना चांगली जाणीव आहे. त्यावर मात करुन किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन उद्धव यांना पुढे वाटचाल करायची आहे. ""मी चांगला वक्ता नाही. मला बाळासाहेबांसारखं (आणि राजसारखंही) भाषण करता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब आणि माझी कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळेच शिवसेनेचा तोंडावळा वेगळा आहे,'' हे उद्धव अगदी स्वतःहून मान्य करतात. मी फर्डा वक्ता नाही, मला वक्तृत्व जमत नाही. पण त्यामुळं मी संघटना वाढवू शकत नाही, इतकंच त्यांचं म्हणणं आहे.

नवनिर्माणाचे वाटोळे
अगदी बरोबर राज हे बाळासाहेबांप्रमाणेच फर्डे वक्ते आहेत. त्यांच्यासारखेच उत्तम नकलाकार आहेत. फर्स्ट क्‍लास व्यंगचित्रकारही आहेत. पण "मनसे'चे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची कारकिर्द अगदीच व्यर्थ आहे. मराठीच्या मुद्‌द्‌यावर दहशत निर्माण करण्याची त्यांची वृत्ती म्हणजे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम नसल्याचे द्योतक आहे. गेल्या दोन वर्षांत जो उत्तम संघटन करु शकला नाही आणि कार्यकर्त्यांना चांगला कार्यक्रम देऊ शकला नाही, तो नेता महाराष्ट्राचे नवनिर्माण काय करणार, हा कोणालाच न सुटणारा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमध्येही आता तेच तेच मुद्दे येताहेत. नाविन्य संपले आहे. म्हणूनच लवकरच राज यांच्या नवनिर्माणाचे वाटोळे झाले नाही तरच नवल! त्या तुलनेत उद्धव यांचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होताना दिसतो आहे.

आहे हे असं आहे...
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या छंदांबद्दल प्रचंड अभिमान आहे. असतात एकेकाला महागडे छंद. आता मला मासे पाळण्याचा छंद आहे आणि माझ्याकडे काही लाखांचा मासा होता, त्याला माझा काय दोष? माझा त्याच्यावर जीव जडला होता आणि तो गेला म्हणून मला दुःख झालं. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल उद्धव कसलीच भीडभाड न बाळगता उपस्थित करतात. मासा मेला ही माध्यमांसाठी (लोकसत्ताच!) मथळ्याची बातमी होते पण दोन आठवड्यांपूर्वी चार दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची बातमी माध्यमांना महत्वाची वाटत नाही. हीच का तुमची बातमीदारी, असा सवाल उपस्थित करुन ते स्वतःची बाजू समर्थपणे मांडतात. लपवाछपवी करण्याची गरज त्यांना वाटत नाही. आहे हे असं आहे, पटत असेल तर या अन्यथा धन्यवाद हा सावरकरी विचारांचा वसा घेऊन ते पुढे निघालेत. (येतील त्यांच्या सह, नाही येणार त्यांच्याविना आणि आड येतील त्यांना पार करुन ः सावरकर)

शेतीतलं कळत नाही...
आपल्याला जे कळत नाही, ते स्पष्टपणे मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे दिसतो. म्हणूनच ते म्हणातात, मला शेतीतलं कळत नाही. कारण मी कधीच शेतात गेलो नाही. पण शेतकरी मरतो आहे, हे मी उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. वीज मोफत, पाणी मोफत, कर्जही माफ पण तरीही शेतकरी आत्महत्या करतोय. कारण त्याला बी-बियाणं नाही, खतं वेळेवर मिळत नाही, पावसाचा पत्ताच नाही, पाणी मिळालंच तर पिक येतं. पण त्याला सरकार भावच देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पिकाला भरपूर भाव दिल्याखेरीज आत्महत्या थांबणार नाही, हे कळण्यासाठी शेतीतलं कळलंच पाहिजे, असं नाही. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा पटतोही. कारण शेतीतलं कळणारे सत्तेत असतानाही शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांचाच नेता कृषीमंत्री आहे. मग उपयोग काय
त्यांना शेतीतलं कळून?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर प्रचंड पकड मिळविली आहे. शिवसेनेला एका दिशेने आणि एका विचाराने नेण्याचा त्यांचा मानस आहे. जुन्या नेत्यांना न दुखावता त्यांनी स्वतःचं स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन केलं आहे. विनायक, संजय आणि भारतकुमार ही राऊत मंडळी, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या सहा सल्लागारांच्या सहाय्याने त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांनी संघटना मुळापासून बांधून काढली आहे. भविष्यात त्यांना कितपत यश प्राप्त होतं त्याचं भाकित आताच करणं अवघड आहे. पण शिवसेना संपली, असं म्हणणाऱ्यांना या "कारकुनांच्या नेत्या'नं चोख उत्तर दिलंय...

Monday, August 04, 2008

शास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा

गेल्या अनेक वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चाखायला मिळाली. निमित्त होते माझे जुने मित्र आणि लोकसत्ताचे पत्रकार विनायक करमरकर शास्त्री यांच्या भेटीचे. शास्त्री रस्त्यावर एक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे संदीप खर्डेकर देखील होते. त्यावेळी चला अजंठामध्ये जाऊ असा सूर शास्त्रींनी आळवल्याने मला थोडासा धक्काच बसला आणि अजंठाच्या चवीची ओळख करमरकर बुवांनाही असल्याचे ऐकून थोडेसे बरेही वाटले.

सांगायची गोष्ट अशी की, शास्त्री रस्त्यावर तेव्हा फार कमी हॉटेल्स किंवा रेस्तराँ होती. अर्थात, आजच्या घडीला खूप आहेत अशातील काही गोष्ट नाही. पण तेव्हा चॉईसच नव्हता. पण त्यावेळीही जे काही तीन-चार स्पॉटस होते त्यात अजंठाची अगदीच न्यारी होती. शास्त्री-खर्डेकर यांच्याबरोबर गेल्यानंतर चव अजूनही कायम राखली असल्याचे जाणवले. गरमागरम वडा आणि इडली सांबार ही अजंठाची वैशिष्ट्य. पण इथे मिळणारी दहा पंधरा प्रकारची श्रीखंड, भेळ-मिसळ आणि फक्कड चहा यांचीही तोड नाही. पण वडा द बेस्ट.

अजंठाचा वडा
वड्याचा आकार म्हणाल तर इतर ठिकाणच्या वड्यांच्या तोंडात मारेल असा. आणि चव थोडीशी झणझणीत. सोबतीला त्यापेक्षा झणझणीत हिरवी चटणी. हवी असेल तर चिंचगूळ आणि खजूर यांची चटणीही आहेच एकावेळी कमीत कमी दोन वडे खाल्ल्याशिवाय पठ्ठा उठणारच नाही. बाहेर मिळत असलेल्या वड्यांच्या तुलनेत अजंठाच्या वड्याची किंमत थोडी अधिक असेल पण चव चांगली असेल तर खवय्यांची कोणतीही किंमत मोजायची तयारी असते

काही दिवसांपूर्वी अजंठाच्या बरोबर समोर जोशी वडेवालेची शाखा सुरु झाली होती. तेव्हा अजंठाचा खप कमी होणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण अजंठाची चव आणि त्यामुळे विक्री आहे तशीच आहे. त्यामुळे जरा बरं वाटलं.

इडली सांबारमध्ये बुडली
वड्याप्रमाणेच इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे इडली सांबार. आता इडली सांबारमध्ये काय आहे खाण्यासारखं आणि ते देखील एका मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण एकदा खाऊन पहाच. आकाराने मोठी आणि तरीही हलकी अशी वाफाळलेली इडली तुमच्यासमोर असेल तर काय हिंमत तुम्ही इडली गट्टम करणार नाही. कोणत्याही अण्णाच्या तोंडात मारेल अशी इडली हे अजंठाचं वैशिष्ट्य आहेच.

पण सांबार ही इथली दुसरी खासियत. पूर्वी कुमठेकर रस्त्यावर असलेल्या स्वीट होममध्ये (आणि आताही) सांबारची जी चव होती तीच चव अजंठामध्ये आहे. तूरडाळीचं वरण, त्याला सांबारची चव आणि वरुन झणझणीत तर्री असा सांबार खाताना अक्षरशः घाम निघतो. पण चव कायम लक्षात राहते अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परिणामामुळे नव्हे.

श्रीखंडाची रेलचेल
श्रीखंड म्हटलं की एक-दोन प्रकार आपल्याला आठवतात. वेलची, आम्रखंड आणि फारफार तर केशरबदाम किंवा केशर पिस्ता. पण तुम्ही स्ट्रॉबेरी, पायनापल, चॉकलेट आणि असे काही एकदम हटके प्रकार कधी ऐकले आहेत का. नाही ना मग तुम्ही एकदा तरी अजंठाला भेट द्यायलाच हवी. कारण इथे मिळणारी ही व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच मिळेल.

Wednesday, July 23, 2008

तिसऱ्या आघाडीसाठी सुगीचे दिवस

सरकार वाचलं असलं तरी सहा-आठ महिन्यांनी निवडणुका होणारच आहेत. आता सरकार वाचलं आणि अणु कराराची पुढील कार्यवाही झाली तरी निवडणुकीत त्याचा सरकारला विशेष फायदा होईल, असं वाटत नाही. विश्‍वासदर्शक ठराव केंद्र सरकारनं जिंकला असला तरी त्यामुळं भविष्यातील केंद्रातील राजकारणावर विशेष परिणाम होणार नाही. मनमोहनसिंग सरकारचे आजचे मरण उद्यावर ढकलले गेले आहे इतकेच! पण कॉंग्रेस सरकारची गच्छंती निश्‍चित आहे. पण कॉंग्रेसऐवजी कोण की पुन्हा कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली छोट्या मोठ्या पक्षांची खिचडी? त्यामुळं भविष्यातील राजकीय स्थिती कशी असेल, यावर घेतलेला हा लेखाजोखा...

पंतप्रधानापदाचे बाशिंग बांधून बसलेल्या लालकृष्ण अडवानी यांच्या भारतीय जनता पक्षाची अवस्था फारशी काही चांगली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि सध्याची "रालोआ' यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस व चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम "रालोआ'बरोबर नाही. जयललितादेखील भाजपबरोबर येण्याच्या मनःस्थितीत नाही.

बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या संयुक्त जनता दलात प्रचंड धुसफूस सुरु आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचे फारसे सख्य नाही. तिकडे अकाली दलाचे नेतेही पंजाब प्रदेश भाजप नेत्यांवर खार खाऊन आहेत. पण तरीही अकाली दल भाजपची साथ सोडणार नाही, हे निश्‍चित. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना, ओरिसात बिजू जनता दल व पंजाबमध्ये अकाली दल हेच खरेखुरे साथीदार भाजपच्या मदतीला असतील. शिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा हुकुमी एक्का या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय नसेल, ही गोष्ट कुंपणावरच्या मतदारांना आकृष्ट करताना महत्त्वाची ठरणार आहे. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थापनात हातखंडा असलेल्या प्रमोद महाजन यांचीही उणीव पक्षाला जाणवेल.

सध्यातरी लालकृष्ण अडवानी यांच्याइतका दुसरा सर्वमान्य नेता भाजपकडे नाही. राजनाथसिंह, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद आणि दुसऱ्या फळीतील इतर नेत्यांमध्ये सुरु असलेले हेवेदावे देखील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करु शकतात. पक्षांतर्गत धुसफूस लक्षात घेता 134 चा आकडा पुन्हा गाठणे हे देखील भाजपपुढे आव्हान असेल. मित्रपक्षांची घटती संख्या पाहिली तर "रालोआ'चे बळ देखील वाढणे अवघडच वाटते आहे.

कॉंग्रेसची गोची
प्रचंड वाढलेली महागाई हा एकच मुद्दा कॉंग्रेसला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कारणीभूत आहे. विरोधक जर संघटित आणि शक्तिशाली असते, तर पुढील निवडणुकीत कॉंग्रेसला नक्कीच शंभरचा आकडा गाठता आला नसता. पण सोनिया गांधींचे नेतृत्व आणि कमकुवत विरोधक यामुळे कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागणार नाही. अणुकरार झाला काय किंवा नाही झाला काय, याचा विचार सामान्य नागरिक मतदान करताना करणार नाही. तेव्हा आमच्यामुळे अणुकरार झाला किंवा विरोधकांमुळे अणुकरार रखडला, असा कोणत्याही स्वरुपाचा मुद्दा कॉंग्रेसने पुढे केला तरी त्याला भारतीय नागरिक कितपत साथ देतील, याबाबत साशंकता आहे.

महागाईचा भस्मासूर रोखण्यासाठी तुम्ही काय केले, पेट्रोल आणि घरगुती गॅसचे दर आटोक्‍यात ठेवण्यात तुम्ही अपयशी का ठरला, असे प्रश्‍न नागरिकांनी विचारले, तर त्याचे फारसे समाधानकारक उत्तर कॉंग्रेसकडे नसेल आणि जे उत्तर कॉंग्रेस पक्ष प्रचारादरम्यान देईल, त्यामुळे नागरिकांचे समाधान होईल, असे काही वाटत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला "अँटीइन्कम्बन्सी'चा फटका बसणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सरकारविरोधी वातावरणाचा फटका कमी बसावा यासाठी कॉंग्रेस कोणती उपाययोजना करते आणि त्यात त्यांना कितपत यश येते, यावर कॉंग्रेस कितपत मजल मारेल, हे ठरणार आहे. पण भाजपप्रमाणेच कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्‍यता धूसरच वाटते आहे.

नव्या पर्यायांचा विचार
अशा परिस्थितीत पुन्हा तथाकथित तिसरी आघाडी आणि डावी आघाडी यांना सरकार स्थापनेची सर्वाधिक संधी असेल. केंद्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा राज्यांमध्ये क्रमांक एकचा शत्रू कॉंग्रेसच आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, अण्णा द्रमुक, लोकदल किंवा बहुजन समाज पक्ष असे पक्ष कॉंग्रेसला दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊ शकतात. हे पक्ष पूर्वी भाजपच्या तंबूत होते. पण तेव्हा नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांचे होते. आता तसे नाही. त्यामुळेच ही मंडळी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती किंवा निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्‍यता फारच थोडी आहे.

प्रादेशिक पक्षांना शक्‍यतो कॉंग्रेसबरोबर युती नको आहे. त्यामुळेच भाजप आणि कॉंग्रेस यांना समान अंतरावर ठेवणारा एखादा पर्याय पुढे येत असेल, तर त्याला या पक्षांची पसंती असेल. अण्णा द्रमुक व तेलुगू देसम या पक्षांना गेल्या निवडणुकीत जबर फटका बसला होता. मात्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील राजकारणाची सद्यस्थिती पाहता यंदाच्या निवडणुकीत जयललिता व चंद्राबाबू यांचे पक्ष पुन्हा बहरात येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही पक्षांनी जर "क्‍लिन स्वीप' मिळविला, तर 65 ते 70 खासदारांचा एक गट तयार होईल व हाच गट सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावेल.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा विविध निवडणुकांमधून त्याचा प्रत्यय आला आहे. शिवाय हा पक्ष फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिला नसून, शहरी मतदारांनाही त्यांनी आकर्षित केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तर त्यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. अशा परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पंधराचा आकडा ओलांडेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. भाजप आणि कॉंग्रेस यांना बाजूला ठेवून नवा पर्याय अस्तित्वात येत असेल, तर राष्ट्रवादीही त्यात सहभागी होऊ शकते.

हरियाणात लोकदल, आसाममध्ये आसाम गण परिषद, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष या पक्षांची भूमिका काही प्रमाणात अशीच असेल. शिवाय लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल व शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्षही तिसऱ्या पर्यायाला समर्थन देऊ शकतात.

पश्‍चिम बंगाल आणि केरळ हे डाव्यांचे बालेकिल्ले. शिवाय तमिळनाडू, आंध्र प्रदेश व देशाच्या इतर राज्यांमधून एखाद दुसरा खासदार निवडून आणण्याची ताकद डाव्यांमध्ये आहे. सध्या डाव्यांचा आकडा साठपर्यंत पोचतो. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांना हा "जॅकपॉट' लागण्याची शक्‍यता कमीच. तरीही डावे 45-50 पर्यंत नक्की पोचतील, अशी परिस्थिती आहे.

अशा परिस्थितीत तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचे सरकार व त्याला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा हा पर्यायही निवडणुकीनंतर अस्तित्वात येऊ शकतो. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचे खासदार जवळपास समान झाले आणि दोघांनाही दीडशे-पावणेदोनशेचा आकडा ओलांडता आला नाही तर पुन्हा एकदा एच. डी. देवेगौडा किंवा इंद्रकुमार गुजराल यांच्याप्रमाणेच नवा पंतप्रधान देशाला मिळण्याची शक्‍यता निश्‍चित आहे.

Friday, June 13, 2008

चविष्ट कोल्हापूर

कोल्हापूर हे शहर माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. यापूर्वी कोल्हापूरला आम्ही जायचो ते फक्त अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि पुण्याला परतायचं किंवा मग रत्नागिरीत उतरायचं. पण कोल्हापूरमध्ये राहण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. कोल्हापूरमध्ये राहण्याची संधी मिळाली आणि शहराचं सांस्कृतिक, क्रीडा तसंच खाद्यवैभव अगदी जवळून अनुभवता आलं.
कुस्ती असो किंवा मिसळ, फेटा असो किंवा तांबडा-पांढरा रस्सा, दागिन्यांचा साज असो किंवा धारोष्ण दूध कोल्हापूरची आठवण अगदी प्रकर्षानं होते.
कोल्हापूरमधील आमच्या खाद्ययात्रेची सुरवात झाली ती फडतरेंच्या मिसळनं. कोल्हापुरी मिसळ म्हणजे झणझणीत आणि जाळ हा माझा समज पुण्यातील काटा किर्रर...नादच खुळा या उपहारगृहानं यापूर्वीच खोडून काढला होता. पण काटा किर्रर...ला मिळणारी मिसळ ही फडतरेंच्या मिसळची चक्क कॉपी असल्याचं अगदी पहिला चमचा घेतल्यानंतर जाणवलं.
एका स्टीलच्या वाडग्यात मिसळ देण्याची परंपरा फडतरेंनी 1991 मध्ये सुरु केली. मूग किंवा मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, कांदा, बारीक शेव आणि त्यावर तर्री असलेला रस्सा. रस्सा रंगावरुन खूप जाळ असेल असं वाटत असलं तरी तसं नाही. आपण अगदी सहजपणे खाऊ शकू असा हा रस्सा असतो. चवीला काहीसा कडवट. अर्थात, ही कडवट चव तिखटाची आणि ती देखील गूळ न घातल्यानं आलेली. रस्सा घालून झाला की त्यावर एक चमचा दही घालून मिसळची डिश तुमच्यासमोर ठेवली जाते. सोबतीला लादी पाव. रस्सा कितीही खा दुसऱ्या दिवशी कोणताच त्रास होणार नाही याची हमी. घसा धरणार नाही किंवा जास्त धावपळही करावी लागणार नाही.
सकाळी चार वाजल्यापासून रस्सा (पातळ भाजी किंवा कट) तयार करण्यास प्रारंभ होतो. रोज साधारणपणे अडीचशे डिश जातात, असं प्रवीण फडतरे सांगतात. कोल्हापूरमध्ये चोरगे, दत्त आणि इतरही अनेक मिसळवाले आहेत. पण फडतरे ते फडतरेच असं इथले खवय्ये सांगतात. आता माझाही त्यावर विश्‍वास बसलाय.
पांढरा-तांबडा रस्सा हा देखील तितकाच अप्रतिम. पुण्यात काही ठिकाणी पांढरा रस्सा मिळतो पण तो अस्सल नाही हे इथं आल्याशिवाय कळत नाही. तांबड्यापेक्षा पांढरा रस्साच अधिक चांगला वाटला. मिसळीचा कट आणि मटणाबरोबर मिळणारा तांबडा रस्सा यामध्ये थोडाफार फरक आहे. पण दोन्ही भाऊ भाऊच!
पांढरा रस्सा म्हणजे मटणाचं पाणी, नारळाचं दूध, थोडीशी हळद आणि मीठ. काही चतुर मंडळी यामध्ये "कॉर्न फ्लॉवर' किंवा इतर पदार्थ मिसळून बनवाबनवी करतात. पण आमचे मित्र चारुदत्त जोशी यांचे मित्र संजय निकम यांच्या वूडीज या हॉटेलमध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा पिऊन मन तृप्त झालं.
कोल्हापूरमध्ये आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे दीपकचा वडा. इतर ठिकाणी मिळते तशीच बटाट्याची भाजी किंवा सारण. पण वरील आवरण मूगाच्या पिठापासून तयार केलेले किंवा कदाचित हरभरा डाळच अधिक जाड दळून ते कालविले असावे. पण डाळ दाताखाली येईल अशी व्यवस्था त्यात होती. त्यामुळे फक्त सारणाची चव न लागता वरच्या आवरणाचीही चव लागावी अशी व्यवस्था. पुण्या-मुंबईत चार-पाच रुपयांत मिळणारा वडा येथे आठ रुपयांना ऐकून डोळेच चमकतात. पण आकार काहीसा मोठा आणि चवही अप्रतिम त्यामुळे "लेट्‌स एन्जॉय'! सोबतीला पावभाजीचा पाव न देता लादीपाव दिला जातो. त्यामुळे वडापाव घेण्याऐवजी नुसता वडाच घेण्यात हशील आहे.
शिवाजी चौकामध्ये मिळणारा दावणगिरी लोणी डोसा एकदा तरी खावाच. मी पुन्हा एकदा जाऊन खाणार आहे. नेहमीच्या डोसा पिठापेक्षा काहीसे पातळ पीठ. शिवाय नेहमीच्या डोशापेक्षा आकाराला वेगळा. हा डोसा पातळ नसतो आणि घावनसारखा असतो. पण त्यावर लोणी अक्षरशः ओतले जाते. अगदी मोकळ्या हाताने. शिवाय एकदा लोणी टाकल्यानंतर तो जेव्हा पलटी करतात तेव्हा तितकेच लोणी पुन्हा एकदा टाकून पाघळलेल्या लोण्यात तो डोसा अक्षरशः घोळविला जातो. "हेल्थ कॉन्शस' लोकांनी इकडे वळू देखील नये. मी हा डोसा दोनवेळा खाल्ला. लहान आकारामधील स्पंज डोसा (तीन) देखील "ट्राय' करायला हरकत नाही.
गुरुवारी सकाळी कोल्हापूर स्टेशनजवळ खालेल्ला भडंगचा प्रकारही चांगला आहे. स्टेशनपलिकडे जाधव चौकात लाड बंधू भडंगची गाडी आहे. त्यावर सात रुपयात एक प्लेट भडंग मिळते. लाड यांनी घरी तयार केलेलं झणझणीत भडंग. त्यावर कांदा, टोमॅटो, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून मिळणारं भडंग एकदम चटकदार. कोल्हापूरमध्ये राहून इतकं वैविध्यपूर्ण आणि चविष्ट खाल्लं आहे की विचारता सोय नाही. पुन्हा पुन्हा अशीच संधी मिळावी, अशीच अपेक्षा आहे. म्हणजे आता टेस्ट केलेले पदार्थ पुन्हा एकदा खाता येतील आणि जे राहिलं आहे त्यावर आडवा हात मारता येईल.

Saturday, May 24, 2008

वडापाव ते बर्गर...

प्रत्येक राज्याची एक खाद्यसंस्कृती असते. तशी महाराष्ट्रानेही स्वतःची खाद्यसंस्कृती जपली आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणापासून ते रणरणत्या उन्हात भाजून निघणाऱ्या नागपूरपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गरमागरम पुरणपोळीपासून ते झणझणीत तांबड्या रश्‍श्‍यापर्यंत आणि पाघळणाऱ्या लोण्यामुळे लज्जत वाढणाऱ्या कांद्याच्या थालिपीठापासून ते वऱ्हाडी मंडळींच्या अभिमानाचा विषय असलेल्या वडाभातापर्यंत साऱ्या पदार्थांची नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटणारच. त्यात मालवणी मसाले वापरून केलेले पॉम्फ्रेट किंवा सुरमई मासे, सोलकढी, कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन-मटण, खानदेशचे वैशिष्ट्य वांग्याचे भरीत-भाकरी आणि खिचडी, सोलापूरचं सुकं मटण आणि शेंगादाण्याची चटणी, मराठवड्यात प्रसिद्ध असलेली शेंगाची पोळी आणि अस्सल ब्राह्मणी संस्कृतीमध्ये मुरलेले श्रीखंड, सोललेल्या वालाची (डाळिंब्यांची) उसळ व आळूची भाजी.

मराठी खाद्यपदार्थांची यादी करण्याचे ठरविले व प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची नावे काढण्यास सुरवात केली तर मग विचारता सोय नाही. अर्थात, महाराष्ट्राची खाद्यपताका महाराष्ट्राबाहेरही फडकत ठेवणारा एकमेव पदार्थ म्हणजे अस्सल मराठी वडापाव. महाराष्ट्राला वडापाव ही काही नवी गोष्ट नाही. शिवसेनेने मुंबईमध्ये वडापावला लोकमान्यता मिळवून दिली. हळूहळू मुंबईबाहेरही वडापावची लोकप्रियता वाढली व वडापाव ही महाराष्ट्राची ओळख बनली. पोहे, पुरी भाजी, कट वडा व वडा उसळ या नाश्‍त्यासाठीच्या अस्सल मराठी पदार्थांच्या यादीत वडापाव रुजू झाला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकतापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसैनिकांच्या भाषेत मुंबई वडापाव) मिळू लागला आहे. प्रत्येक प्रांतामध्ये त्या ठिकाणच्या आवडीनिवडीनुसार चवीमध्ये बदल होत गेला पण वडापाव कायम राहिला.

झणझणीत मिसळ, पुरणपोळी आणि वडापाव यासारखे महाराष्ट्रीयन पदार्थ जसे महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरले तसेच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतही अनेक बदल होत गेले. सर्वसमावेशाची संस्कृती जोपासणाऱ्या महाराष्ट्राने परप्रांतामधील खाद्यपदार्थांनाही कधी दुय्यम वागणूक दिली नाही. नेहमी भरभरुन प्रेमच केले आहे.

गुजरातमधील कच्छी दाबेली, ढोकळा, फाफडा, खाकरा, ठेपला आणि उँधियो यांनी कधी "मेन्यू कार्ड'मध्ये आणि खवय्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले ते समजले देखील नाही. तीच गोष्ट दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदूवडा आणि सांबार-रस्समची! बंगालचा रसगुल्ला, केरळचा मलबारी पराठा, पंजाबची लस्सी आणि शेकडो प्रकारचे "स्टफ' पराठे, राजस्थानची दाल-बाटी, इंदूरची कचोरी, हैदराबादची चिकन-मटण बिर्याणी हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहेत की हे पदार्थ बाहेरचे आहेत यावर विश्‍वासही बसणार नाही.

परराज्यातीलच नव्हे तर परराष्ट्रातील खाद्यपदार्थांनाही मराठी माणसाने आपलेसे केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राईस-नूडल्स आणि सूप्स यांचा समावेश असलेली चायनीज खाद्यसंस्कृती, बर्गर, फ्रॅंकी, हॉटडॉग अशी "जंकफूड'ची संस्कृती जोपासणारे अमेरिकी खाद्यपदार्थ, पिझ्झा आणि पास्ता हे इटालियन खाद्यपदार्थ, नेपाळ, भूतान तसेच भारताच्या ईशान्य भागात लोकप्रिय असलेले मोमोज असे अनेकविध पदार्थ मराठी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवित आहेत.

मेक्‍सिकन, लेबनीज, थाई, जॅपनीज आणि कॉन्टिनेन्टल संस्कृतींमधील शेकडो खाद्यपदार्थ भारतात आणि महाराष्ट्रात कधीच दाखल झाले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ मिळणारी "मल्टिक्‍युझिन रेस्तरॉं'ची लोकप्रियता वाढू लागली आहे. अर्थात, परराज्यातील आणि परराष्ट्रातील खाद्यपदार्थ कितीही लोकप्रिय झाले तरी त्याचा फटका मराठमोळ्या खाद्यपदार्थांना कधीच बसला नाही आणि यापुढेही बसणार नाही.

मराठी माणसाच्या हृदयातील महाराष्ट्रीयन खाद्यपदर्थांचे स्थान अढळ आहे. पावसाचा वर्षाव सुरु असताना वाफाळलेला चहा व सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. रस्त्यावरुन जात असताना उकळत्या तेलात वडे सोडल्यानंतर सुटलेला घमघमाट तुम्हाला त्या गाडीपाशी खेचून नेतो. वरण-भात, पोळी भाजी व आमटी किंवा तिखट कालवण हे नेहमी साधंच वाटणारं जेवण महिनाभर घराबाहेर राहिल्यानंतर स्वर्गसुखासारखं वाटू लागतं.

जी गोष्ट शाकाहारी पदार्थांची तीच मांसाहारी पदार्थांची. बाहेर हॉटेलमध्ये कितीही उत्तम नॉनव्हेज मिळू दे पण घरगुती पद्धतीनं वाटण करुन तयार केलेल्या चिकन किंवा मटणाला वेगळीच चव असते. त्यामुळेच अनेकदा "रेस्तरॉं'मध्ये खास घरगुती पद्धतीने बनविलेले अमुक अमुक पदार्थ येथे मिळतील, अशा पाट्या लावाव्या लागतात. थोडक्‍यात काय तर महाराष्ट्राला समृद्ध व संपन्न करण्यासाठी जे प्रयत्न झाले किंवा होत आहेत त्यात महाराष्ट्राबाहेरुन आलेल्या व्यक्तींचाही महत्वाचा वाटा आहे. तसाच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती संपन्न करण्यात मराठमोळ्या पदार्थांप्रमाणेच महाराष्ट्राबाहेरील पदार्थांचाही खारीचा का होईना पण वाटा आहेच. सर्वसमावेशकता हा गुण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा विसर न पडू देता पडला आहे, हे विशेष.

सरतेशेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे ती एकच गोष्ट महत्वाची. स्वातंत्र्यवीरांना मासे प्रचंड आवडायचे. त्यांना काही जणांनी विचारले की, तुम्ही तर ब्राह्मण मग तुम्ही मासे कसे काय खाता? सावरकरांनी त्यावेळी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. सावरकर म्हणाले, ""प्रत्येकाने आपल्याला रुचेल ते आणि महत्वाचे म्हणजे पचेल ते खावे.'' धर्म, संस्कृती, जात, देश, भाषा आणि वर्ण या गोष्टींचा संबंध खाद्यपदार्थांशी जोडला जाऊ नये हेच त्यांना सुचवायचे होते. सामाजिक क्षेत्रातही क्रांतिकारक विचार जोपासणाऱ्या सावरकरांचे खाद्यसंस्कृतीबद्दलचे हे विचारही आजच्या जमान्यात तितकेच उपयुक्त आहेत.

(This Article was Published in Sakal's SATARA editon on 25th May 2008)

Tuesday, March 11, 2008

अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी...


गरमागरम बटाटे वडा आणि फक्कड चहा

वडेवाले जोशी, रोहित वडेवाले, गोली वडापाव, जम्बो वडापाव आणि चौकाचौकांमध्ये गाड्यांवर मिळणाऱ्या वड्याची चव चाखून कंटाळा आला असेल तर शिवाजी रस्त्यावर असलेल्या "प्रकाश स्टोअर्स'च्या गल्लीत असलेल्या अन्नपूर्णाला एकवार जरुर भेट द्या.

आपण त्या गल्लीत शिरल्यानंतर जसजसे "अन्नपूर्णा'च्या जवळ जायला लागू तसतसा आपल्याला वडे तळण्याचा घमघमाट जाणवू लागतो. तेथेच आपली विकेट पडते. मग "एक प्लेट' वडा किंवा दोन वडापाव खाल्ल्याशिवाय आपला आत्मा थंड होत नाही. वास्तविक पाहता अन्नपूर्णा हे खरोखरच नावाप्रमाणे आहे. बटाटा वड्यापासून ते भाजणीच्या वड्यापर्यंत बऱ्याच "व्हरायटी' येथे मिळतात. मग त्यात उडीद वडा व साबुदाणा वडा हे प्रकारही आलेच. दक्षिणेकडील इडली-चटणी देखील आहे. मराठमोळी ओल्या नारळाची करंजीही आहे. पण बटाटा वड्याची चव म्हणाल तर काही औरच!

साधारणपणे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील गर्दी वाढू लागते आणि अन्नपूर्णासमोर उभे राहून खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांचीही. पूर्वी कुमठेकर रस्त्यावरील प्रभा विश्रांती गृहातील वडा हा इतरांपेक्षा वेगळा होता. तो अजूनही आहे. पण अनेक अटी आणि नियमांच्या चौकटीत अडकलेला तो वडा न खाल्लेलाच बरा अशी अवस्था होऊन जाते. अन्नपूर्णाचा वडा अगदी तसाच आहे. म्हणजे अटी व नियमांच्या चौकटीत अडकलेला नव्हे. तर चवीला अगदी हटके!

इथे गर्दीच इतकी असते की प्रत्येक घाण्यातील वडे अगदी हातोहात संपतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गरमगरम वडे हमखास मिळतात. वड्यातील सारणामध्ये बटाटा व कांदा यांच्या जोडीला लसूणाचाही हलका स्वाद असतो. शिवाय या सारणामध्ये लिंबाचीही थोडी चव जाणवते. त्यामुळेच हा वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. चणा डाळीच्या पिठातही मीठ व तिखट असते त्यामुळे तेही बेचव लागत नाही. शिवाय वड्याला चण्याच्या पिठाचे आवरण अगदी पातळ असते. त्यामुळे वडा आणखी लज्जतदार लागतो.

"अन्नपूर्णा'तील चटणीही अगदी चविष्ट. बटाटा वड्यासोबत मिळणारी हिरवी किंवा साबुदाणा वड्यासोबत मिळणारी दाण्याची चटणी दोन्ही चटण्या तितक्‍याच चवदार. "चटणी वड्यातच टाकली आहे' असे कुमठेकर रस्त्यावरील उपहारगृहात हमखास मिळणारे उत्तर येथे मिळत नाही. वड्याला पुरेशी चटणी येथे दिली जाते. आणखी हवी असेल तर परतही चटणी मिळते. साबुदाणा वडा तितकाच खमंग अन्‌ भाजणीचा वडाही चांगलाच खुसखुशीत. पण माझे ऐकाल तर अनेकदा भेट दिल्यानंतर बटाटा वड्याची चव तुमच्या जिभेवर रुळली की मगच इतर खाद्यपदार्थांकडे वळा.

वडा खाल्ल्यानंतर चहा आलाच. अर्थात, वडा खाल्ला नाही तरी चहा आहेच पण खाल्ल्यानंतर आवर्जून आहेच. चहाची तल्लफ भागविण्यासाठी तुम्हाला खूप दूर जाण्याची गरज नाही. "प्रकाश स्टोअर्स'कडून "रॉंग साईड'ने (अर्थातच, चालत) तुम्ही नाना वाड्याकडे जाऊ लागा. नाना वाड्यासमोर कॉर्नरला महालक्ष्मी नावाचे अमृततुल्य आहे. दूध जास्त आणि पाणी कमी अशा द्रवापासून वेलचीयुक्त चहा प्यायल्यानंतर खाद्य यात्रेचे एक वर्तुळ पूर्ण होईल.

पेरुगेट जवळील "नर्मदेश्‍वर'सारखा चहा पुण्यातील असंख्य अमृततुल्यांमध्ये मिळतो. "महालक्ष्मी' येथील चहा त्याजवळ जाणारा पण अगदी तसा नाही. येथे दूधाचे प्रमाण पाण्यापेक्षा अधिक असल्यामुळे साधा चहाच अगदी "स्पेशल'सारखा वाटतो. "अन्नपूर्णा'चा वडा आणि "महालक्ष्मी'चा चहा यांच्यासाठी शिवाजी रस्त्यावर जाच!

Sunday, February 17, 2008

पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

पॅटिस आणि वाटाण्याचा अस्सल रगडा

"रगडा पॅटिस'. हा पदार्थ मला पाणीपुरी इतकाच आणि भेळपेक्षा जास्त आवडतो. अगदी लहानपणी सारसबागेत असलेल्या विविध भेळेच्या स्टॉलवर गेल्यानंतर भेळ की रगडा पॅटिस असा प्रश्‍न विचारल्यानंतर माझं हमखास उत्तर असायचं रगडा पॅटिस!
थोडक्‍यात काय मला रगडा पॅटिस अगदी मनापासून आवडते. त्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी कोठे काय चांगले मिळते, याचा शोध घेत असताना मला रगडा पॅटिस मिळण्याचे एक अप्रतिम ठिकाण सापडले. पत्र्या मारुतीजवळ उभ्या असलेल्या एका भेळेच्या गाडीवर भेळेपेक्षाही रगडा पॅटिसच अधिक चविष्ट असते.
गेल्या अनेक वर्षांपासून अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर दहा वर्षांपासून आम्ही पत्र्या मारुतीजवळ असलेल्या त्या भेळेच्या गाडीवर नित्यनियमाने भेट देत आहोत. रमणबागेच्या चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जायला लागलो की, पहिल्याच चौकात (पत्र्या मारुतीच्या) तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्यात सुरवातील भेळेच्या दोन गाड्या, नंतर कच्छी दाबेलीची एक गाडी आणि सर्वात शेवटी नीरा व सरबतांचा एक स्टॉल आहे.
भेळेची पहिली गाडी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिकडे फक्त भेळच चांगली मिळते. पण दुसरी गाडी मात्र, एकदम अष्टपैलू आहे. भेळ, रगडा पॅटिस, रगडा पुरी, एसबीडीपी आणि अगदी पाणीपुरीही लय भारी!साधारण साठीच्या आसपास असलेले वडील आणि त्यांची दोन अफलातून मुलं गाडीवर असतात. पण वैशिष्ट्य असं की, गाडीवर कोणीही असलं तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. इतर गाड्यांवर मिळतात ते सर्व पदार्थ मिळत असले तरी तुम्ही आवर्जून रगडा पॅटिस टेस्ट करा. आम्ही इतके वर्ष "टेस्ट' करतो आहोत म्हणूनच सांगतोय.
अनेक ठिकाणी रगडा पॅटिसमध्ये जो बटाटा किंवा वाटाणे असतात ते पूर्णपणे शिजलेले नसतात. त्यामुळे ते चावताना त्रास होतो. तसेच गोड नाही पण तिखट पाण्याची चवही रगडा पॅटिसमध्ये महत्वाची असते. रगड्याची ही भट्टी या गाडीवर अगदी जबरदस्तपणे जमलेली आहे. रगडा आणि पॅटिस हे पूर्णतः शिजलेले असल्यामुळे दोन्ही वाटाणे आणि पॅटिस एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि रगडा एकदम "झकास' होतो. त्यात गोड आणि तिखट पाणी, तिखट, मीठ, मसाला व चाट मसाला यांचे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे पदार्थाला येणारी चव अगदी अप्रतिम असते.
एकदा का रगड्याने भरलेली ही डिश तुमच्या पुढे आली की, ती व्यवस्थितपणे कालवून घ्या आणि एक-दोन चमचे "टेस्ट' करा. मग तुम्हाला कळेल खरे रगडा पॅटिस कशाला म्हणतात. दोन-तीन चमचे खाल्ल्यानंतर पुन्हा थांबा. थोडे तिखट आणि गोड पाणी त्यात मिसळा. पुन्हा रगडा व्यवस्थित कालवा. चव आणखी सुधारली आहे, असे तुम्हाला जाणवले. एका प्लेटमध्ये इतके रगडा पॅटिस येते की, तुम्ही कितीही खादाड असाल तरी तुमची भूक नक्कीच भागते. इतर ठिकाणी हे समाधान क्वचितच मिळते.
रगडा पॅटिसननंतर पाणीपुरीची एक प्लेट जरुर घ्या. एकट्याला एक जाणार असेल तर उत्तमच. पण नसेल तर दोघा-तिघांमध्ये एक तरी अवश्‍य घ्या. पाणीपुरी झाल्यानंतर गाडीवर असलेला माणूस तुम्हाला तिखट-गोड पाणी हवे का, असे विचारेल. नेहमी घेत नसाल तरी येथे जरुर पाणी प्या. सरते शेवटी इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मसाला पुरी मागायला विसरु नका. हे सर्व झाल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त नाही झाला तरच नवल.

Sunday, February 03, 2008

शनिवारवाड्याजवळ "दिल्ली चाट'


पाणीपुरी प्रेमींसाठी नवा "स्पॉट'

भेळेच्या गाडीवर गेल्यानंतर तुम्ही रगडा पॅटिस, रगडा पुरी, भेळ किंवा एसबीडीपी (शेव बटाटा दहीपुरी) यापैकी काहीही खा पण सर्वात शेवटी एक प्लेट पाणीपुरी होणारच. पाणीपुरी हा पदार्थ आवडत नाही, अशी व्यक्ती अगदी विरळ. माझ्या ओळखीत आहेत एक-दोन जण असे पण बहुतेक सर्वांनाच पाणीपुरी आवडते.
तुम्ही जर पाणीपुरीचे अगदी "डाय हार्ड' फॅन असाल तर शनिवार वाड्याजवळ उभ्या असणाऱ्या भेळ-पाणीपुरीच्या अनेक गाड्यांपैकी "दिल्ली चाट' अशी पाटी असलेल्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खाच. तुम्ही जर अस्सल चाहते असाल तर फक्त एक प्लेट खाऊन तुम्ही स्वस्थ बसूच शकणार नाही. दुसरी प्लेटही पाहता पाहता संपून जाईल.
बालगंधर्व पुलावरील गाडी, पत्र्या मारुतीजवळील गाड्यांपैकी लक्ष्मी रस्त्याकडील गाडी, पेशवाईच्या चौकातील गाडी, एसएनडीटीजवळ किंवा बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेली "कल्याण भेळ', सारसबागेतील भेळ व चाटची तमाम दुकाने, डेक्कन- संभाजी बाग परिसरातील तमाम गाड्या व इतर भागांमध्ये मिळणाऱ्या पाणीपुरीच्या तुलनेत शनिवारवाड्याजवळ उभ्या असलेल्या या गाडीवरील पाणीपुरी नक्कीच वरचढ आहे, असा दावा मी छातीठोकपणे करु शकतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या ठिकाणची पाणीपुरी खाऊन हे शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. फक्त मीच नाही तर आमच्या ऑफिसमधील अनेकांनी हे मान्य केले आहे.
पाणीपुरीचा आत्मा असतो पुदीना चटणीचे पाणी. पाणीपुरीतील पुरी सर्व ठिकाणी सारखीच असते. शिजविलेले वाटाणेही सगळीकडेच असतात. पण "दिल्ली चाट'च्या पाणीपुरीत जे तिखट पाणी टाकतात, त्याला तोडच नाही. मिरचीचा ठेचा व पुदीना चटणी यांचे जे काही अफलातून मिश्रण असते ते प्रत्यक्ष चव चाखूनच पाहिले पाहिजे. पाणीपुरी तयार करणारा जो "चाचा' आहे तो स्वतः ते पाणी तयार करतो. त्यामुळे रोज पाण्याची चव सारखीच असते.
शिवाय तुम्हाला तिखट किंवा गोड पाणीपुरी जशी पाणीपुरी हवी असेल त्यानुसार अप्रतिम "कॉम्बिनेशन' तुम्हाला मिळते. चिंच-गुळाचे गोड पाणी व मिरची-पुदीनाचे तिखट पाणी यांची चव इतर ठिकाणपेक्षा येथे अगदी "हटके' आहे. त्यामुळेच एकदा येथे येऊन गेलेला खवय्या पुन्हा फिरकला नाही, असे होणारच नाही.

पाणीपुरीसाठी कोठेही जायची तुमची तयारी असेल तर मग एकदा शनिवारवाड्याजवळ येऊन जाच!

Friday, January 25, 2008

नावाप्रमाणेच "सवाई'!


सवाई व्हेज...

सवाई हे नाव उच्चारताच सर्वप्रथम पुणेकरांच्या डोळ्यासमोर येतो तो सवाई गंधर्व महोत्सव. इतिहासात माधवराव पेशवे यांच्या नावामागे सवाई पदवी असल्याचे आपल्याला माहीत असते; पण तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) नित्यनियमाने ये-जा करणाऱ्या पुणेकरांसाठी मात्र "सवाई' हे नाव आणखी एका गोष्टीशी जोडले गेले आहे. ते म्हणजे "सवाई व्हेज'. सात महिन्यांपूर्वी सुरू झालेले सवाई आता नावारूपाला येत असून, खऱ्या अर्थाने "सवाई' होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रस्ता) लागल्यानंतर पु.ल. देशपांडे उद्यानाच्या थोडेसे अलीकडे सवाई व्हेज रेस्तरॉं आहे. "हॉटेल मॅनेजमेंट'चे धडे घेतलेल्या अमित शिंदे या युवकाने "सवाई'ची सुरवात केली. शाकाहारी पदार्थांच्या "रेस्तरॉं'ला साजेसे व एकदम वेगळे नाव ठेवण्याची इच्छा अमितची होती. शिवाय "रेस्तरॉं' ज्या परिसरात आहे तेथील नागरिकांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्‍वभूमी विचारात घेऊन नाव निश्‍चित करावयाचे होते. त्यामुळे बऱ्याच विचारांती सवाई नाव निश्‍चित झाले. अर्थात, एकदमच "हटके' असलेले हे नाव "क्‍लिक' झाले हे सांगणे नकोच.

सिंहगड रस्त्यासारख्या विस्तारणाऱ्या पट्ट्यात "सवाई'चा प्रशस्तपणा नजरेत भरणारा आहे. अगदी दोनशे-सव्वादोनशे मंडळी एका वेळी बसू शकतील इतकी मोठी जागा. त्यातही गार्डनमध्ये निवांतपणे बसण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शिवाय 40-50 जणांच्या ग्रुपसाठी स्वतंत्र व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. "रेस्तरॉं'मध्ये प्रवेश करताच नजरेस पडते ते फेटा बांधून अगदी थाटात बसलेल्या मराठी सरदाराचे तैलचित्र.

"सवाई'मध्ये पंजाबी, चायनीज, पिझ्झा, सिझलर्स, पावभाजी, ज्यूस आणि डेझर्ट अशी खाद्य पदार्थांची मोठी रेंज उपलब्ध आहे. पण त्यातही पंजाबी व पावभाजी यांनाच नागरिकांची सर्वाधिक पसंती. इतर ठिकाणी मिळणारे पदार्थ व "सवाई'ची खासीयत यांची माहिती घेतानाच कोणत्या "डिश' मागवायच्या हे निश्‍चित केले होते.

"सवाई'चे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेतच, पण सिंहगड रस्त्यावरील पूर्वीपासून राहणारी मंडळी आणि शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांमधून स्थलांतरित झालेली मंडळी, अशा दोघांनाही सवयीची वाटणारी चव जपण्याचा प्रयत्न "सवाई'मधील विविध "डिश'मधून करण्यात आला आहे.

"स्टार्टर्स'मध्ये "स्पीनच मलेशिया' व "व्हेज सीक कबाब'ची ऑर्डर दिली. बारीक चिरून घेतलेल्या पालकामध्ये तिखट-मीठ व मसाले टाकून त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतात. हे गोळे तळून घेतल्यानंतर ते टोमॅटो व चायनीज सॉसमध्ये परतून घेतले जातात. सजावटीसाठी काजू-बदाम यांचा वापर होतो. पालकाचे हे "स्टार्टर्स' आवर्जून घ्या. "व्हेज सीक कबाब' हे ऐकायला थोडेसे विचित्र वाटते; पण त्याची चव अगदी उत्तम आहे. सर्व भाज्यांचा खिमा करून मग त्यात विशिष्ट मसाले टाकून थोडीशी तिखटाच्या बाजूला झुकणाऱ्या या कबाबचा आकार अगदी "सीक कबाब'सारखाच!

"मेन कोर्स'मध्ये पारंपरिक भाज्या आहेतच, पण व्हेज मराठा, व्हेज लाजवाब व पनीर जंगी ही "सवाई'ची खासीयत. पण आम्ही मात्र व्हेज मालवणीची "ऑर्डर' दिली. मालवणी चवीत पनीर मालवणी हा "ऑप्शन'ही आहे. भाज्या व पनीरचा वापर इतर "डिश'मध्ये होतो तसाच असला तरी मालवणी मसाले वापरून "ग्रेव्ही' तयार होते. त्यामुळे चव आणि रंग या गोष्टी अगदी "मालवणी करी'च्या जवळ जाणाऱ्या.

वेगळी "डिश' चाखायची असेल तर "व्हेज बगदादी'चा जरूर विचार करा. सर्व भाज्या एकत्रित करून थोडीशी घट्ट "ग्रेव्ही' असलेली ही डिश सर्व्ह करण्याची पद्धत अगदी निराळी आहे. "सिझलर्स' जसे बिडाच्या पात्रात कोबीच्या पानात "सर्व्ह' करतात, त्याप्रमाणे भांड्यामध्ये "टोमॅटो ऑम्लेट'मध्ये बगदादी "सर्व्ह' करण्याची पद्धत आहे. पण असे करताना भाजीची "क्वांटिटी' घटते. त्यामुळे भाजीवर "टोमॅटो ऑम्लेट'चे टॉपिंग करून दिले जाते.

"व्हेज हिंडोल' ही अशीच हटके डिश! सर्व भाज्यांना साथ मिळते ती पनीर व मशरूम यांची. कोथिंबीर व पुदिना यांचा वापर "ग्रेव्ही'मध्ये जास्त असतो. त्यामुळे भाजीला हिरवा रंग तर येतोच, पण त्याचबरोबर पुदिन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाजीला हलकी "मिंट'ची चवही येते. त्यामुळे ही भाजीही काही जण आवर्जून मागतात, अशी माहिती व्यवस्थापक विजय पुजारी यांनी दिली.

पावभाजीतही कोल्हापुरी पावभाजी ही वेगळी चव "सवाई'ने जपली आहे. मुळातच भाजी तयार करताना त्यात मसाल्यांचे प्रमाण अधिक टाकून ही भाजी तिखट केली जाते. तिखट टाकून जाळ करणे वेगळे व मसाले वापरून झणझणीत करणे निराळे. दुसरा प्रकार "सवाई'ने स्वीकारला आहे. झणझणीतपणाला या ठिकाणी मागणी मिळणे साहजिकच आहे. त्यामुळे "कोल्हापुरी पावभाजी' येथे चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.

"सवाई'पासून तीन-चार किलोमीटरच्या आत राहणाऱ्या मंडळींना घरपोच सेवाही पुरविली जाते तीही अगदी "फ्री ऑफ चार्ज'! "सवाई'चे आणखी एक वेगळेपण म्हणजे अमितने "ऑर्कुट'वर "सवाई व्हेज' नावाची "कम्युनिटी'च तयार केली आहे. या "कम्युनिटी'च्या माध्यमातून नव्या "डिश' सुरू करणे अथवा सुरू असलेल्या पदार्थांमध्ये ग्राहकांनी सुचविलेले बदल करून पाहणे, अशा गोष्टी होतात. "सवाई'चे निस्सीम चाहते "कम्युनिटी' आवर्जून "जॉईन' करतात व इतरांना "सवाई'बद्दल सांगतात. चार जानेवारीलाच सुरू झालेल्या "कम्युनिटी'चे 24 जण सदस्य झाले आहेत. तेव्हा तुम्हालाही "सवाई' पसंत पडले तर तुम्हीही "कम्युनिटी' "जॉईन' करायला विसरू नका!

"सवाई व्हेज'
देवगिरी अपार्टमेंट,
ए विंग, तानाजी मालुसरे रस्ता,
पुणे 411030.
सकाळी 11 ते रात्री 11.30

Saturday, January 19, 2008

सौंदर्य व्हेज नॉनव्हेज


डेक्कनच्या "सौंदर्य'ला चवीची जोड!

जंगली महाराज रस्ता आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) "रेस्तरॉं'ची काही कमी नाही. अगदी चायनीजपासून पंजाबीपर्यंत आणि पिझ्झा-पास्तापासून सिझलर्सपर्यंत सर्व पदार्थ आपल्याला या दोन रस्त्यांवरील "रेस्तरॉं'मध्ये मिळतात. पण अस्सल मराठी पद्धतीने बनविलेले घरगुती चवीचे मांसाहारी पदार्थ देणारे एकही "रेस्तरॉं' या ठिकाणी नाही. ही कसर भरून काढली आहे मुरकुटे बंधूंच्या "सौंदर्य'ने.

लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य'ची नवी शाखा नुकतीच रानडे इन्स्टिट्यूटसमोर सुरू झाली आहे. अगदी नावापासून वेगळेपण जोपासणाऱ्या "सौंदर्य रेस्तरॉं'ने दहा वर्षांपूर्वी शास्त्री रस्त्यावर शाकाहारी व मांसाहारी "रेस्तरॉं'ची सुरवात केली. खवय्यांच्या जिभेवर "सौंदर्य'ची चव रुळल्यानंतर त्यांनी डेक्कन परिसरात आणखी एक शाखा सुरू करण्याचा विचार केला व कल्पना प्रत्यक्षात उतरविली.

साधारण 90 ते 100 जण बसू शकतील इतकी प्रशस्त जागा व डेक्कनच्या परिसराला शोभेल अशी अंतर्गत सजावट या गोष्टी "सौंदर्य'च्या सौंदर्यात भर घालतात. शिवाय वातानुकूलित दालनाचा पर्यायही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डेक्कनवर आल्यानंतर ग्राहकांना भेडसावणारा पार्किंगचा प्रश्‍न बाळासाहेब मुरकुटे यांनी सोडविला असून "सौंदर्य'मध्ये पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. "सौंदर्य'चे व्यवस्थापन सागर व सूरज मुरकुटे यांच्याकडे आहे.

चिकन, मटण आणि माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. असे असले तरी तितकेच चविष्ट शाकाहारी पदार्थ "सौंदर्य'मध्ये मिळतात. शाकाहारी-मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळी भांडी वापरतात, हे सर्वज्ञात आहे. पण येथे दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी आचारीही स्वतंत्र आहे. त्यामुळे शाकाहारी मंडळी अगदी निर्धास्तपणे येथील जेवणाचा आस्वाद लुटू शकतात. शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य' डेक्कनवर आले तरी चवीमध्ये फरक पडलेला नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य!

मटण ही "सौंदर्य'ची खासीयत! त्यातही मटण केशरी बिर्याणी आणि पुणेरी मटण हे दोन पदार्थ "मेन्यू कार्ड'मध्ये अगदी वेगळे वाटतात. मटण केशरी बिर्याणी तयार करण्याची पद्धत अगदी नेहमीसारखीच. ही बिर्याणी करताना साजूक तुपाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, हे "सौंदर्य'चे वेगळेपण. शिवाय या बिर्याणीमध्ये शेवटचा थर हा काजू, मनुका, बेदाणे आणि केशर यांचा असतो. त्यामुळे याला आपण "मटण ड्रायफ्रूट बिर्याणी' असेही म्हणू शकतो.

पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात.

"चायना राईस' हादेखील कमी ठिकाणी मिळणारा पदार्थ येथे मिळतो. मटण खिमा आणि अंडा भुर्जी तयार करून एकत्रितपणे परतली जाते. त्यानंतर त्यात बासमती राईस टाकून "चायना राईस' तयार होतो. काही ठिकाणी याला "छिना राईस'ही म्हणतात.

अस्सल शाकाहारी असाल तरी तुमच्यासाठी काही खास डिशेस येथे आहेत. पनीर बटर मसाला, बैंगन मसाला, बैंगन भरता, पनीर मटर मसाला आणि पालक पनीर अशा नेहमीच्या पदार्थांच्या जोडीला तंदुरी आलू, नसीली भेंडी आणि पनीर राजवाडी हे पदार्थ काहीसे वेगळे आहेत. नसीली भेंडी ही लालभडक "ग्रेव्ही'मधील भाजी अगदीच "टेम्प्टिंग' दिसते. तेलामध्ये भेंडी "फ्राय' करून घेतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा, टोमॅटो, ओले खोबरे, मसाला व ब्याडगी मिरचीपासून तयार केलेली "पेस्ट' हे पदार्थ एकत्र करतात. त्यामध्ये "फ्राय' केलेली भेंडी टाकून हे एकजीव होईपर्यंत परततात.

"पनीर राजवाडी'मध्ये पनीरचे मोठे तुकडे केले जातात. पनीरचे हे तुकडे कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळले जातात. तपकिरी रंगाचे झाल्यानंतर हे तुकडे बाहेर काढतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा-टोमॅटो, मसाल्याचे वाटण टाकून "ग्रेव्ही'चा बेस तयार केला जातो. मग पुन्हा एकदा पनीरचे तुकडे "शॅलो फ्राय' करून त्या "ग्रेव्ही'मध्ये टाकले जातात. वरून पुदिना पेस्ट आणि सिमला मिरचीचे बारीक तुकडे टाकून ते मिश्रण उकळले जाते. अशी ही "पनीर राजवाडी'देखील विशेष लोकप्रिय आहे.


सौंदर्य रेस्तरॉं,
लॅंड स्क्वेअर इमारत,
नामदार गोखले रस्ता,
डेक्कन जिमखाना,
पुणे.
वेळ स. 11.30 ते दु. 4 आणि सायं. 7 ते रा. 11.30.
No :- 9823034452

Sunday, January 06, 2008

पुण्यातील "दक्षिण भारत"

पुण्यातील "दक्षिण भारत"

सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्‍त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता एक चक्कर झालीच. तिथे गेल्यानंतर मला हैदराबाद, चेन्नई किंवा बंगळूरमध्ये गेल्यासारखंच वाटलं.

जवळपास सहा ते सात गाड्यांवर सांबार-चटणीच्या बरोबर इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा असे दक्षिणी पदार्थ खाण्यात पुणेकर मंडळी गुंग असल्याचे दिसेल. गाड्या जरी सहा-सात असल्या तरी प्रत्येक गाडीवर गर्दी जवळपास सारखीच! शिवाय प्रत्येक गाडीवरील ग्राहक रोजचे किंवा ठरलेले!! रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि परिसरात दक्षिणी मंडळींचे प्रमाण तुलनेने अधिक. ज्यांना सर्वसाधारणपणे मद्रासी म्हणतात अशा मंडळींचे प्रमाण जाणवण्याइतपत असल्यामुळे या ठिकाणी अशा नाश्‍त्याच्या गाड्या लागणे नवीन नाही.

सांबार भात आणि रस्सम भात यांच्यासाठी प्रसिद्ध असलेली "मद्रासी मेस' याच ठिकाणी आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांच्या प्रेमींनी इथे जायलाच हवे. असो. सांगण्याचा उद्देश्‍य असा की, मी तेथे गेलो आणि पुन्हा एकदा हैदराबादची चव अनुभवता आली. पुण्यातील अनेक उडुपी किंवा इतर "रेस्तरॉं"मधून इडली-डोसा मिळतो पण या ठिकाणी गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची चव काही औरच.

नायर नावाच्या एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गाडीवर इडली-वडा सांबार मागितला. इडली-मेदूवड्याच्या वरती सांबार आणि सांबारच्याच वरती चटणी अशी डिश समोर आली. मेदूवडा एक नंबर. पण इडली मात्र म्हणावी तितकी मऊ किंवा हलकी नाही. शिवाय सांबारची चवही मद्रासी नव्हती. पण मेदूवड्याची कमाल होती. मेदूवडा इतका हलका होता की विचारु नका. सांबारमध्ये तर त्याची काही वेगळीच चव लागत होती. या गाड्यांवर सांबार आणि चटणी पुन्हा मागितली तरी मिळते. शिवाय जादा चटणी-सांबार देताना मालकाचा चेहराही उपकार केल्यासारखा नव्हता हे विशेष!

हे पदार्थ खाणाऱ्या मंडळींमध्ये अर्थातच दक्षिणी मंडळी कमी होती. जादा संख्या होती ती मराठी आणि गुजराती मंडळींची! ठेपले, खाकरा, फाफडा आणि पापडी यांच्यासारख्या पदार्थांना रविवारची सुटी देऊन गुजराती मंडळींनी गाड्यांभोवती गर्दी केली होती.

या गाड्यांवर आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांवर चटणी आणि सांबारच्या बादल्या किंवा पातेली नसतात. तर हे पदार्थ स्टीलच्या बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इडली किंवा मेदूवडा सांबार हवा असेल तर काही मिनिटे इडली किंवा मेदूवडा सांबारच्या बरण्यांमध्ये बुडवून ठेवला जातो. दोन-एक मिनिटे सांबारमध्ये राहिल्यानंतर मग तो वडा तुमच्या प्लेटमध्ये टाकून त्यावर सांबार आणि चटणी टाकली जाते. आहे की नाही गंमत!

नायर शेजारच्या गाडीवर डोसा, उत्तप्पा आणि हे पदार्थ मिळत होते. डोसा इतका पातळ की दोन मिनिटांमध्ये डोसा तव्यापासून अलग होऊन वर नाही आला तर शप्पथ. येथेही सांबारपेक्षा चटणीच अधिक चांगली. त्यामुळे चटणीला मागणी अधिक! या दोन गाड्यापासून थोडी दूर एका कडेला एक महिला गाडी लावते. तिच्याकडे आज गर्दी कमी होती. पण तिचे वैशिष्ट्य असे की, तिची गाडी संध्याकाळीही असते. इतर गाड्या फक्त सकाळी असतात. शिवाय त्या बाईकडील डोसाही अप्रतिम असतो. वैशाली-रुपालीच्या तोंडात मारेल असा कुरकुरीत डोसा तिच्याकडे मिळतो. कधी जर चुकून त्या भागात गेलात तर जरुर खा!

आणखी एक गाडी येथे आहे तिथे जायला विसरु नका. या गाडीचा परवाना चेट्टीयार नावाच्या माणसाकडे आहे. गाडीवर कदाचित तोच असावा. कपाळाला गंध लावून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरो नाही पण "व्हिलन' म्हणून शोभेल अशी एक व्यक्ती ही गाडी चालविते. चेट्टीयारच्या गाडीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्याकडे मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी हे सर्वच पदार्थ एक नंबर! त्यामुळे तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडेच जा असा माझा सल्ला असेल. मी पण तेच करणार आहे.

मेदूवडा आणि इडली तितकेच मऊ आणि हलके. चटणी पण घट्ट, थोडी तिखट आणि अगदी थोडी आंबट. सांबारही मद्रासी चवीकडे झुकणारे. चेट्टीयारची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्याकडे तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले घावन मिळतात. डोश्‍यापेक्षा थोडे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडे पातळ, अशा मधल्याच आकारातील. त्याला घरी आपण घावन म्हणतो त्याला गाडीवर डोसा म्हणतात. तो डोसा एका डिशमध्ये चतकोर आकारात घडी घालून ठेवला जातो. त्यावर नेहमीप्रमाणे चटणी आणि सांबार टाकून "सर्व्ह' केला जातो. तुम्हाला एक डोसा सांबार-चटणी टाकून दे, अशी ऑर्डर ऐकू आली तर घाबरुन जाऊ नका. तुम्हीही असा रगडा एकदा खाऊन बघा. खूष व्हाल.

शिवाय या पदार्थांचे दर फार अधिक नाहीत. इडली-चटणी-सांबार दहा रुपये, इडली-मेदूवडा आणि सांबार-चटणी अकरा रुपये तर मेदूवडा-सांबार-चटणी बारा रुपये. डोसा बारा रुपये आणि उत्तप्पा तेरा रुपये. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा हे अधिक स्वस्त आणि चविष्टही! तिथे गर्दी जमते ती काय उगाचच?

Saturday, January 05, 2008

सर्जा रेस्तरॉं


मंगेशकरांचे "फॅमिली रेस्तरॉं'

आपण आज आलो आहोत पुण्यातील पहिल्या "सेलिब्रिटी रेस्तरॉं'मध्ये! पण औंध भागात बरोबर 11 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या "सर्जा'ची ओळख "सेलिब्रिटी रेस्तरॉं' पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. चविष्ट पदार्थ आणि कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पूरक वातावरण यामुळे "सर्जा' आता "फॅमिली रेस्तरॉं' बनले आहे.

लतादीदी येथील दाल-खिचडी आवडीने खातात. बाळासाहेबांना मांसाहारी पदार्थ एकदम वर्ज्य. उषाताईंचे जेवण मात्र "चिकन तंदुरी' किंवा "फिश फ्राय'शिवाय पूर्णच होत नाही. आशाताईंची "स्टाईल'च हटके. आशाताई तर भटारखान्यात जाऊन मालवणी पद्धतीने मासे कसे बनवायचे याचे धडे स्वयंपाकी मंडळीना देतात. हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. त्यामुळेच त्यांची "सर्जा'वर इतकी मर्जी आहे.

सुरवातीला "सर्जा'चा नावलौकिक सर्वदूर पोचविण्यासाठी मंगेशकरांच्या पुण्याईचा उपयोग झाला. नंतर पदार्थांची चव व वातावरण यामुळे खवय्या ग्राहकांचा "फ्लो' टिकवून ठेवणे व्यवस्थापक रणजित शेट्टी यांना शक्‍य झाले. "सर्जा' म्हणजे सिंह. हे नाव स्वतः लतादीदींच्या आग्रहावरून देण्यात आले होते. अर्थात, हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे, हे सांगितल्याशिवाय कळत नाही. लतादीदी किंवा इतर भावंडांची पेंटिंग्ज किंवा छायाचित्रे भिंतीवर न लावता आवर्जून मिलिंद मुळीक यांच्या निसर्गचित्रांना भिंतीवर स्थान देण्यात आले आहे. अर्थात, हा निर्णयही खुद्द दीदींचाच! "रेस्तरॉं'मध्ये कायम "वर्ल्डस्पेस' रेडिओवरील संगीत कायम सुरू असते.

"सर्जा' हे पूर्णपणे "नॉर्थ इंडियन' आहे. त्यामुळे व्यवस्थापन शेट्टी यांच्याकडे असले तरी येथे इडली-डोसा आणि तत्सम दक्षिण भारतीय पदार्थांना "मेन्यू कार्ड'मध्ये स्थान नाही. उत्तर भारतीय पद्धतीने तयार केलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थ हीच येथील खासीयत. चिकन, मटण व माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध असले, तरी "सर्जा' विशेष प्रसिद्ध आहे "पंजाबी डिशेस'साठीच!

"पालक सूप' हा सध्या अनेक ठिकाणी मिळणारा पदार्थ देण्यास आम्ही सुरवात केली, हे शेट्टी आवर्जून सांगतात. त्यामुळे "पालक सूप' घ्याच, असा त्यांचा आग्रह! पंजाबी पदार्थांमध्ये पनीरचे पदार्थ हे "सर्जा'चे वैशिष्ट्य. आपण पनीर खातो की बटर असा अनुभव पनीरची सब्जी खाताना आला नाही, तरच नवल. पनीरच्या जोडीला "सरसू का साग' आणि "मक्के की रोटी' हा अस्सल पंजाबी पदार्थही "झकास'.

आम्ही मात्र, "लसूनी तवा डिंगरी' ही मशरूमची डिश मागविली. लसूण म्हणजे उग्र. पण येथे मशरूमच्या भाजीला लसणाची अगदी हलकी फोडणी दिलेली असते. त्यामुळे लसणाची चव लागते; पण त्याच्या उग्रपणाचा त्रास होत नाही. "मकई मिर्च मसाला' ही डिशही विशेष लोकप्रिय आहे. स्वीट अमेरिकन कॉर्न व सिमला मिरची यांच्यापासून तयार केलेल्या व "रेड ग्रेव्ही'मधून "सर्व्ह' केल्या जाणाऱ्या या "डिश'चे "रेटिंग' प्रथमपासूनच "हाय' आहे.

दाल किंवा पालक खिचडी ही खुद्द लतादीदींची आवडीची "डिश'. अर्थात, इतर खवय्या मंडळींची मनेही या "डिश'ने जिंकली आहेत. पण "मेन्यू कार्ड'मधील "दहीभात तडकावाला' हा पदार्थ लक्ष वेधून घेतो व त्याचीच "ऑर्डर' करायला भाग पाडतो. साधा पातळ दहीभातच, पण त्याला लाल मिरचीचा तडका दिल्यामुळे भाताला एकदम वेगळीच चव प्राप्त होते. "दहीभात तडकावाला' ही सर्व मंगेशकरांची समान आवडती "डिश'. मंगेशकर मंडळींच्या जेवणाचा शेवट दहीभातानेच होतो, असे शेट्टी सांगतात.

बाकी मग "नॉनव्हेज'मध्ये चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्‍यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्‍स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत. "स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात. त्यामुळे मासा खायचा तर "फिश तवा'च!

सॅलड व रायताचे नऊ-दहा प्रकार, "आईस टी' व "लिची विथ क्रीम' तसेच "लिची विथ आईस्क्रीम' यांनाही विशेष मागणी असते. साधारणपणे शंभर जण एका वेळी बसू शकतात, अशी व्यवस्था येथे आहे. त्यामुळे "वेटिंग'चा प्रश्‍न उद्‌भवत नाही. औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत; पण तरीही एकदा का होईना, मंगेशकरांच्या या आवडत्या "रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.


"सर्जा रेस्तरॉं',
127-2 सानेवाडी,
आयटीआय रस्ता,
औंध,पुणे - 411007.
वेळ ः दुपारी 12 ते 3.30
व सायंकाळी 7 ते 11.30