Wednesday, April 17, 2013

'त्या' गीताचं काय करायचं?

जवळपास सात वर्षांनंतर दुसरा ब्लॉग सुरू केला आहे. परममित्र निलेश बने यांचा प्रचंड आग्रह मोडणे मला शक्य झाले नाही. सर‘मिसळ’ असे ब्लॉगचे नाव असून तो महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. जे सुचेल, जे दिसेल ते लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा वाचा आणि व्यक्त व्हा... धन्यवाद.
 
एखाद्या ओळखीच्या माणसाला खूप दिवसांनी पाहिलं तर कसं मस्त वाटतं. खूप वर्षांपासून ओळख असेल आणि अनेक दिवस भेट झाली नसेल तर भेटल्यावर बरं वाटतं. पण मी तिला खूप दिवसांनी काल पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं. तिचं तसं दिसणं मनाला अगदी चटका लावून गेलं

तीम्हणजे गीता देशपांडेमला रस्त्यावर भटकताना दिसली. विस्कटलेले केस, खूप दिवस आंघोळ केल्यामुळं काळवंडलेली त्वचा, मळलेल्या पंजाबी ड्रेसचा फक्त टॉप आणि तोही कुठं कुठं फाटलेला, एका हातात प्लॅस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हातात छोटीशी काठी अशा अगदी विपन्नावस्थेत गीता मला दोन-चार दिवसांखाली दिसली. एकटीच स्वतःशी काहीतरी बडबड करत डेक्कनच्या सिग्नलजवळून चालत होती. मी गाडीवर होतो, त्यामुळं अर्धा-एक मिनिट तिचं दर्शन झालं आणि काळीज हेलावलं.

गीता ही अगदी सात-आठ वर्षांपर्यंत आमच्या कॉलनीत राहणारी. माझ्या मागच्याच इमारतीमध्ये. माझ्यापेक्षा साधारण दहा-बारा वर्ष मोठी असेल. तिची आई आणि माझी आई मैत्रिणी किंवा चांगल्या ओळखीच्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं माझं तिच्या घरी आणि तिचं माझ्या घरी जाण येणं अगदी नेहमीचंच. कधी तरी मला एखादं चॉकलेट दे किंवा काय रे अभ्यास करतोस ना, असं विचारणं. किंवा कधी आमच्याकडे काही विशेष केलं तर तो पदार्थ त्यांच्याकडे नेऊन देणं आणि त्यांच्याकडील पदार्थ आमच्याकडे येणं असं चालायचं. इतकीच आमची ओळख.

भारतात सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगची नुकतीच सुरुवात व्हायला लागल्यानंतर म्हणजे १९९० च्या आसपास ती सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि मुंबईमध्ये जॉबला लागली. त्यानंतर आमच्यातील संपर्क खूप कमी झाला आणि नंतर मग तो तुटलाच. मुंबईत नोकरीला असताना तिचं कोणाशी तरी सूत जुळलं होतं. पण त्यानं तिचा ‘फायदा’ घेतला आणि नंतर झिडकारलं, असं कानावर आलं होतं. त्यानं अव्हेरल्यानंतर ती बिथरल्यासारखी वागायची. हे सगळं घडत असतानाच आधी तिची आई गेली आणि नंतर लगेचच एक-दोन वर्षांत वडीलही गेले. मानसिक परिस्थिती ढासळल्यामुळं तिचा जॉबही गेला असावा आणि मग ती पुन्हा पुण्यामध्ये तिच्या घरात येऊन राहू लागली.

आता मात्र गीता पूर्णपणे बदलली होती. बदलली म्हणजे काय तर ठार वेडीच झाल्यासारखं तिचं वागणं होतं. घरामध्ये आदळआपट, भाड्यांची फेकाफेक, जोरजोरात किंचाळणं, शिव्यांची लाखोली वाहणं (ज्यानं फसविलं त्याला आणि तो ज्या जातीचा होता त्या जातीला), विक्षिप्तपणे वागणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास देणं (जिन्यामध्ये तेल ओतणे वगैरे…) असले प्रकार वाढले होते. तिचं वागणं असं झाल्यामुळं नातेवाईकांनीही तिला कधीच झिडकारलं होतं. शेजारी पाजारीही तिला टरकून असायचे आणि फारसं काही बोलायचे नाहीत. अनेक जण तिला त्रास मात्र द्यायचे. म्हणजे उगाचच तिच्या घराला कडी लाव, रस्त्यामध्ये दिसली तर तिला दगड मार किंवा तिला विनाकारण चिडव वगैरे प्रकार वाढले होते.

काही जण तिच्या त्रासाला कंटाळून पोलिसांना बोलवायचे. मात्र, पोलिसांशी ती व्यवस्थित इंग्रजीतून संवाद साधायची आणि त्यांना परतवून लावायची. विक्षिप्त आणि वेडसर वागण्यामुळं तिच्याशी बोलणं किंवा नुसती ओळख दाखविण्याचीही भीती वाटायची. तरीही कधी कधी ती मला भर रस्त्यात ओळख द्यायची. काय करतोस किंवा सध्या कुठे वगैरे विचारायची. आई कशी आहे विचारायची. बरं, अगदी भणंगावस्थेत आहे, म्हणून माझ्याकडे कधी पैसे मागितले आहेत, असं झालं नाही.

तिच्या घराला कोणी बाहेरून कडी लावली असेल तर मला ती काढण्यासाठीही खिडकीतून आवाज द्यायची. त्यावेळी पोटात गोळाच यायचा. कडी काढायला गेलो आणि हिनं काही केलं तर या कल्पनेनंच घाम फुटायचा. पण तरीही जीव मुठीत धरून मी तिच्या घराची कडी काढायला जायचो. पण तिनं कधीच मला काही केलं नाही. तिच्यासाठी काहीतरी करावं, असं खूप वाटायचं. पण काय करावं हे सुचायचं नाही आणि कसा मार्ग शोधावा, हे कळत नव्हतं. तसा मी खूप मोठाही नव्हतो.

नंतर मात्र, तिनं आमच्या इमारतीमध्ये राहणं सोडलंच. का सोडलं, कशामुळं सोडलं हे कोणालाच माहिती नाही. पण नंतर ती घरामध्ये दिसायचीच नाही. फक्त कधी तरी रस्त्यावर दिसायची. मळलेला टी-शर्ट आणि जीन्सच्या पॅण्टमध्ये. अर्थात, तिचं दर्शन नियमितपणे व्हायचं. म्हणजे रोज नसलं तरी आठवड्यातून दोन-तीनदा तरी. म्हणजे ती कॉलनीमध्ये यायची. इकडं तिकडं भटकायची आणि परत गायब व्हायची. मात्र, नंतर काही वर्षं मी ई टीव्ही आणि साम मराठीच्या निमित्तानं हैदराबाद आणि मुंबईमध्ये असल्यामुळं तिची ‘भेट’ व्हायची नाही. सुटीसाठी कधी पुण्यात आल्यानंतर क्वचित तिचं दर्शन व्हायचं.

गेल्या तीन वर्षांपासून मात्र, ती कॉलनीमध्ये कधीच दिसली नाही. सहा-आठ महिन्यांनी कोणीतरी सांगायचं अरे आज मला अमुक तमुक ठिकाणी गीता दिसली. मला पण दोन-एक वर्षांत ती दिसली नव्हती. चार-पाच दिवसांपूर्वी मला ती दिसली आणि हा सगळा प्रवास डोळ्यांसमोरून पुढे सरकला. दोन-तीन दिवस तिचाच विचार करीत होतो. आमच्याच कॉलनीतील कमलेशला त्याच परिसरात गीता दिसली. दोघांनी काही करता येईल का, अशी चर्चा केली. फक्त पैसे किंवा कपडे देऊन काहीच उपयोग नाही. तिला सुधारणं किंवा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणणं आता शक्य आहे का, याबाबत आमचं बोलणं झालं.

खरंच हे शक्य आहे का आणि असेल तर कशा मार्गानं हे शक्य आहे. मुळात तिचा ठावठिकाणा नाही. क्वचित कधीतरी दिसते. त्यामुळं शोधणं कठीण. शिवाय तिची जबाबदारी घेईल, असं सध्या तरी कोणी नाही. तिला सुधारण्याची जबाबदारी समजा कोणी घेतल्यानंतर जितकं लक्ष द्यायला लागेल तितकं लक्ष द्यायलाही कोणी नाही. आर्थिक भार उचलायचा असेल, तर त्याचंही फारसं नियोजन नाही. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात परत आणणं शक्य आहे का, याची चाचपणी तर आम्ही सुरू केलीय. पाहू त्यात यश येतं का ते. कारण तिचं आयुष्य पूर्वपदावर यावं, असं कुठंतरी आतून वाटतंय.