Saturday, December 14, 2013

केरळ ट्रीपमधील संस्मरणीय

मला भेटलेली माणसं…

कोणत्याही ट्रीपवर, दौऱ्यावर किंवा फिरायला गेल्यानंतर तिथं भेटणारी माणसं हा माझ्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रवासात आपले सहप्रवासी कोणकोण असतील किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथं अनपेक्षितपणे कोण भेटेल, ड्रायव्हर वगैरे कसा असेल याबाबत काहीच सांगता येऊ शकत नाही. त्यामुळंच वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्यानंतर तिथं भेटणारी दिसायला अगदी साधी किंवा सामान्य माणसंही कायम आपल्या लक्षात राहतात. केरळमध्ये असतानाही अशीच काही माणसं भेटली… स्वतंत्र ठसा निर्माण करणारी...

पी. सदशिवन… आंध्रातील जज्ज

जयंती जनता एक्स्प्रेस रायचूर स्टेशनात पहाटे पाच पन्नासला पोहोचली. तेव्हा आमच्या समोरच्या सीटवर एक दाम्प्त्य समोरच्या सीटवर येऊन स्थानापन्न झालं. साधारण पन्नास ते पंचावन्न या वयोगटातले असावेत. कोणत्याही दाक्षिणात्या चित्रपटांत हिरो किंवा हिरोईनचे वडील म्हणून शोभलेले असते, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. आल्या आल्या त्यांनी पहिलं काम केलं म्हणजे ताबडतोब झोपले. चार तास झोपल्यानंतर नऊसाडेनऊच्या सुमारास दोघेही उठले. दोघांपैकी नवरोबा पहिल्यांदा उठले, फ्रेश होऊन त्यांनी नाश्त्याचा मोठ्ठा डब्बा उघडला. त्यामध्ये हात घालून मूठभर ‘टॅमरिंड राइस’ बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवला. नंतर थोडे तळलेले दाणे घेतले आणि भाताच्या बाजूला ठेवले. आता हे महाशय स्वतः हा भात खाणार, असं मला वाटलं. पण त्यांनी बायकोला अगदी प्रेमानं हाक मारून उठविलं. मॅडम फ्रेश होऊन आल्यानंतर त्यांनी आधी त्यांना डिश दिली आणि मग पुन्हा एकदा डब्ब्यात हात घालून ‘टॅमरिंड राइस’ प्लेटमध्ये ठेवण्याचा प्रयोग आम्हाला पहायला मिळाला. मॅडमनी सुरुवात केल्यानंतर या महाशयांनी नाश्त्याला सुरुवात केली. 
प्रवासात शेवटपर्यंत ते आमच्याबरोबरच होते आणि प्रत्येकवेळी त्यांच्या या स्त्रीसौजन्याचं दर्शन आम्हाला घडत होतं. नाश्त्यानंतर जेवण, दुपारचा चहा वगैरे अशा अनेक प्रसंगांमधून हेच दिसलं. नवरा बायकोच्या नात्यामध्ये नव्वद टक्के वेळा बरोब्बर उलटं दृष्य पहायला मिळतं. इथं मात्र, परिस्थिती वेगळी होती. तिरुपतीला सदाशिवन यांचा सख्खा छोटा भाऊ रात्रीचं जेवण घेऊन आला होता. आमच्याकडचे पदार्थ आणि सदाशिवन यांच्या भावाच्या घरचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी हळूहळू गप्पांमध्ये रंगत आली. ते कोट्टायमला उतरणार होते. नंतर शबरीमला मंदिरात जाणार होते. 

गप्पांमध्ये त्यांच्याबद्दल एकेक गोष्ट समजत गेली. सदाशिवन हे आंध्र प्रदेशाताली मेहबूबनगरच्या ‘डिस्ट्रीक्ट अॅण्ड सेशन्स’ कोर्टातील जज्ज म्हणजेच न्यायाधीश होते. ते ऐकून मला खरं तर धक्काच बसला. वास्तविक पाहता, न्यायाधीश असल्याचा उगाचच रुबाब दाखविणं किंवा वागणुकीत फरक असणं, असं काहीच जाणवत नव्हतं. मुळातून लाख ते सव्वालाख रुपये महिना पगार (त्यांनी स्वतःच सांगितलेल्या माहितीनुसार) असलेला न्यायाधीश स्लीपर क्लासने प्रवास करतो, हेच आश्चर्यकारक होते. त्यातून त्यांची अत्यंत साधी राहणी, विनम्र आणि सौजन्यशील वर्तणूक ते न्यायाधीश असल्याचं कुठही जाणवू देत नव्हती. 
सुरुवातीला स्वतःची ही आयडेंटिटी लपवून ठेवणारे सदाशिवन अंकल नंतर मात्र भलतेच खुलले. ‘खरं तर मला लेमन राईस आवडतो. पण आमच्या हिला टॅमरिंड राइस आवडतो. पण मी न्यायाधीश असलो तरी घरी माझं काही चालत नाही,’ असे हलकेफुलके विनोद करून वातावरणात रंग भरत होते. न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, न्यायदानाचे कार्य आणि राजकारणी, भ्रष्ट राजकारणी, न्यायाधीशांना असलेले अधिकार आणि त्यांच्यावर असलेली बंधने अशा विषयांवर भरभरून बोलत होते. अर्थात, मी पत्रकार आहे, हे समजल्यानंतरच ते अधिक खुलले. ‘मी आतापर्यंत चार जणांना फाशीची शिक्षा सुनाविली आहे…’ असं ते अगदी अभिमानानं सांगत होते. याच पदावरून मी निवृत्त होणार. आता मला प्रमोशन मिळणार नाही, असंही सांगत होते.
सदाशिवन यांची दोन्ही मुलं पुण्यामध्ये आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला होती. त्यामुळं ते पुण्यामध्ये चार-पाच वेळा येऊन गेले होते. आता त्यांची दोन्ही मुलं पुण्यात नाहीत. त्यामुळं खास आमच्याकडे पुण्याला या, हे आमचं निमंत्रण त्यांनी मान्य केलं. पहाटे चार वाजता आम्ही त्यांना अलविदा करून एर्नाकुलम टाऊन स्टेशनला उतरलो. रेल्वेप्रवासात अचानकपणे एका न्यायाधीशाची झालेली भेट चांगलीच पर्वणी ठरली.

रहीमचाचा… आमचा ड्रायव्हर

केरळमध्ये उतरल्यापासून ते जवळपास निम्म्या ट्रीपपर्यंत ड्रायव्हर कम गाईड असलेले रहीमचाचा आमचे मित्रच बनले. संपूर्ण केरळसह मुंबई आणि दुबईमध्ये ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या रहीम यांनी आमची केरळ ट्रीप अधिक संस्मरणीय बनविली. मुंबईत जवळपास चार ते पाच वर्षे आणि दुबईमध्ये दहा वर्षे त्यांनी ड्रायव्हिंग केले होते. त्यामुळे मल्याळी, तमिळ, अरबी, बऱ्यापैकी चांगलं हिंदी आणि अगदी तोडकं मोडकं इंग्रजी अशा भाषा त्यांना अवगत होत्या. त्याचा आम्हाला पुरेपूर उपयोग झाला. दुबईत काम करून वैतागल्यानंतर ते केरळमध्ये परतले आणि जोबी नावाच्या माणसाच्या टूरिस्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून लागले. त्याच्याकडील साठ गाड्यांवर असलेल्या एका ड्रायव्हरपैकी एक रहीमचाचा. मात्र, अनेक भाषा ज्ञात असल्यामुळे उत्तरेतून येणाऱ्या पर्यटकांसाठी जोबी यांची पसंती रहीम यांना असते.

त्रिशूर जिल्ह्यातील कोडुन्गल्लूर हे त्यांचं गाव. रहीम यांचा इतिहासही एकदम रंजक. त्यांनी पत्नी हिंदू. खूप वर्षांपूर्वी त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन जवळच राहणाऱ्या हिंदू मुलीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर रहीम यांच्या भावाबहिणींसह इतर नातेवाईकांनी त्यांच्याबरोबरचे संबंध तोडले. त्यामुळे आता मी, माझी बायको आणि मुलं इतकंच माझं कुटुंब आहे, असं ते सांगतात. त्यांचा एक मुलगा उम्मन चंडी यांच्या भावाकडील हत्ती संग्रहालयात माहूत म्हणून काम करतो. त्याचा त्यांना प्रचंड अभिमान. दुसरा मुलगा एका बँकेत रिकव्हरी एजंटचं काम करतो. कोच्चीहून इरिंजालकुडाला जाताना त्यांनी आवर्जून आम्हाला त्यांच्या घरी नेलं. बायकोचं ओळख करून दिली. कोणत्याही हिंदू माणसाचं घर वाटावं, अशीच परिस्थिती. मुरुगन, श्रीकृष्ण आणि अनेक हिंदू देवदेवतांची छायाचित्र घरामध्ये लावलेली. 

रहीम हा एकदम दिलखुलास माणूस. केरळमध्ये अनेक वर्षांपासून ड्रायव्हिंग करीत असल्यामुळे रस्ता न रस्त्याची त्यांना. मुन्नारहून कुमारकमला जाताना एका भन्नाट रस्त्यानं त्यांनी गाडी काढली. वरंध घाटातील हेअरपिन टर्न्सला लाजवतील, अशा वळणावळणाचा रस्ता त्यांनी शोधून काढला. कारण तो शॉर्टकट होता. वास्तविक पाहता, केरळमधील टूरिस्ट कंपन्यांचे ड्रायव्हर संध्याकाळी सात-आठनंतर ड्रायव्हिंग करीत नाही. मात्र, डाव्यांच्या बंदचा आम्हाला फटका बसू नये, म्हणून रात्री नऊ वाजता आम्ही मुन्नार सोडलं आणि मध्यरात्री दोन वाजता मजल दरमजल करीत कुमारकमच्या रिसॉर्टला पोहोचलो. 

कुठं काय मिळतं, कुठं काय घ्या, कुठं काय घेऊ नका, याचीही त्यांनी बऱ्यापैकी माहिती होती. कोणत्या हॉटेलमध्ये पंजाबी चांगलं मिळतं, त्यांना माहिती होतं. पण आम्हाला त्याची आवश्यकता नव्हती. ऑथेंटिक केरळी फूड कुठं चांगलं मिळतं, इडली डोसा किंवा उकड्या तांदळाचा भात आणि सांबार कुठं मिळेल, अशी आमची फर्माईश असायची. त्याचीही त्यांना माहिती होती. अनेकदा त्यांनी आमच्यासाठी ऑथेंटिक केरळी पद्धतीच्या खाणावळी आणि फूड स्पॉट्स शोधून काढले. रस्त्याने जाताना तिथल्या परिसराची त्यांना माहित असलेली सर्व माहिती ते आमच्याशी शेअर करायचे. शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील कोणत्या प्रसंगाचं शूटिंग मुन्नारमध्ये झालंय, मोहनलालच्या कोणत्या चित्रपटाचं शूटिंग इथं झालंय, कोच्चीमधील मामुट्टीचं हॉटेल कोणतं वगैरे वगैरे माहिती ते आम्हाला देत असायचे. अनेकदा नको असलेली माहितीही आम्हाला द्यायचे. 
कुमारकममध्ये असताना शेवटच्या दिवशी त्यांनी गळ खरेदी केला आणि सकाळी सकाळी आठ ते दहा मासेच पकडले. त्यांच्या मुलानं शबरीमलाचं व्रत घेतल्यामुळं त्यांच्या घरात मासे तयार होणार नव्हते. त्यामुळं शेजारच्यांना मासे देऊन, त्यांच्याकडेच ते मासे खाणार, असं सांगत होते. मासे बनविण्याची आवड असणारे, क्वचित कधीतरी कोंबडीचं किंवा बदकाचं रक्त पिणारे, निरोप घेतल्यानंतरही केरळ सोडेपर्यंत दोन-तीनवेळा स्वतःहून आम्हाला फोन करून विचारपूस करणारे, पुण्याला तुमच्याकडे जरूर येणार, असं आवर्जून सांगणारे रहीमचाचा उर्फ अन्नन यांनी आमची केरळ ट्रीप अधिक संस्मरणीय केली. त्यामुळं ‍भविष्यात जर केरळला फिरण्यासाठी जाण्याचं तुमचं तुम्ही प्लॅनिंग करणार असाल, तर जरुर संपर्क साधा…

फिलिप जोसेफ… केरळचा शेतकरी

मुन्नारला आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये रहात होतो, त्या रिसॉर्टमध्ये आम्हाला एक मस्त सिक्युरिटी गार्ड भेटला. आम्ही ‘चेकइन’ करायला जात असताना सवयीप्रमाणे छान हसला आणि आम्हाला सलाम ठोकला. आता वयानं मोठ्या असलेल्या माणसानं असा सलाम वगैरे ठोकला की कसंतरीच वाटतं. त्यामुळं जेवण करून आल्यानंतर त्याच्याशी गप्पा माराव्यात असा विचार करून आम्ही जेवायला गेलो. केरळी जेवण मिळणारी सर्व हॉटेल्स बंद झाल्यामुळं मग राजस्थानी भोजनालयात जेवण केलं आणि आम्ही रिसॉर्टमध्ये परतलो. परतताना आम्ही त्या सिक्युरिटी गार्डला गाठलं आणि त्याच्याशी सहजपणे बोलायला सुरुवात केली.

नाव फिलिप जोसेफ. अर्थात, आम्हाला ते खूप उशीरा कळलं. वय साधारण पन्नास असावं. मूळ गाव इडुक्की जिल्ह्यातलं कोणतं तरी छोटं गाव. म्हणजे आम्ही रहात होतो, तिथपासून साधारण चाळीस-पन्नास किलोमीटरवर त्यांचं गाव. गेल्या सात-आठ वर्षांपासून ते तिथं सिक्युरिटी गार्डमधून काम करत होते. गप्पा रंगत गेल्या तसे ते हळूहळू खुलत गेले. बायको आणि दोन मुलं असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करताना त्यांना साडेबारा हजारच्या आसपास पगार मिळत होता. मुळात, दरमहिना ठराविक उत्पन्न मिळावं, म्हणून ते नोकरी करीत होता. त्यांचा मूळ व्यवसाय होता शेती. 
एका इंग्रजी शब्दाला दहा-पंधरा मल्याळी शब्दांची जोड आणि हातवारे अशा पद्धतीनं आमचा संवाद सुरू होता. त्यांची मिरी, वेलची आणि भाताची शेती होती. तीन ते चार एकर असावी. त्यातून त्यांना वर्षाला साधारण आठ लाख रुपयांचं उत्पन्न मिळायचं. अर्थात, हवामान, थंडी आणि इतर गोष्टी अनुकूल असतील तरच. अन्यथा काहीही पदरात पडत नाही. त्यामुळंच मी हक्काच्या पगारासाठी नोकरी करतो, असं ते सांगत होतं. तिथल्या जमिनीचा भाव होता. एक एकरला एक कोटी रुपयांच्या आसपास. म्हणजे कोट्याधीश माणूस सिक्युरिटी गार्डचं काम करीत होता. 

बारावीनंतर दोन वर्षे कॉलेज करून ‘प्री डिग्री’ मिळविल्यानंतर त्याचं शिक्षण सुटलं. अर्थात, स्वतःचं शिक्षण सुटलं असलं तरी त्याची मुलं चांगली शिकत होती. एक मुलगा चांगल्या मार्कांनी ‘सीए’च्या इंटरमध्ये उत्तीर्ण झाला होता. पुढील दोन वर्षांत तो हमखास सीए होईल आणि त्यानंतर मग मी ही नोकरी करणार नाही, असं तो अगदी आनंदानं सांगत होता. खरं तर आताच तुम्ही नोकरी सोडा आणि आराम करा, ही त्याच्या मुलाची आग्रहाची मागणी होती. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या जोडीला अभिमानही तरळत होता. मात्र, त्याला नोकरी लागल्याशिवाय मी नोकरी सोडून काय करू, असं याचं म्हणणं.

कस्तुरीरंगन अहवाल मंजूर व्हायला नको, या डाव्यांच्या मागणीला त्यांचा पाठिंबा होता. मात्र, त्यांच्या हरताळला (बंद) फिलिपचा विरोध होता. डाव्यांच्या बंदचा आता आम्हाला वैताग आलाय. रोज उठतं आणि कोणतरी बंद पुकारतं. खरं तर काँग्रेस आणि डावे या दोघांनाही मी वैतागलोय… यावेळी ओन्ली बीजेपी. ओन्ली मोदी. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर मी पडायचाच बाकी राहिलो होतो. केरळमधल्या कोणत्या तरी खेड्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला मोदी हा पर्याय वाटत होता, हे ऐकून मी चक्रावूनच गेलो. ‘मी ख्रिश्चन आहे. दररोज प्रार्थना करतो. आम्ही चौघंही दर रविवारी नियमितपणे चर्चला जातो. गॉडवर आमचा विश्वास आहे. आम्ही टीव्ही पाहत नाही, सिनेमा बघत नाही. फक्त देवाधर्माचं करतो, आमची नेहमीची काम करतो आणि पेपर वाचतो…’ असं ते सांगत होतं. मात्र, मी ख्रिश्चन आणि मोदी कडवा हिंदू असूनही मी मोदींनाच मत देणार, असं फिलिप जोसेफ ठासून सांगत होते. तीनतीनदा सांगत होते. केरळमध्ये भाजपची एकही जागा येणार नाही, हे सांगायला राजकीय विश्लेषकाची गरज नाही. पण तरीही वृत्तपत्रातून जे काही येत होतं, त्यामुळं त्याचं मत बनत चाललं होतं. मोदींचा नावाचा करिष्मा त्याच्यापर्यंत पोहोचल्याचं पाहून मला धक्काच बसला होता.

मग मी काय करतो, माझं काय काम असतं, कुठं राहतो, मुंबई-पुणं कसं आहे वगैरे माहिती त्यानं जाणून घेतली. पत्रकार आहे, म्हटल्यानंतर त्याची कळी आणखीन खुलली आणि तो अधिक भरभरून बोलू लागला. शेवटी ‘गॉस ब्लेस यू…’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि मग आम्ही निरोप घेतला. पुढच्या वेळी याल तेव्हा माझ्या घरी नक्की या… असं आमंत्रण त्यानं दिलं. नुसतं कोरडं आश्वासन नाही, तर स्वतःचा नंबर आणि पत्ताही लिहून दिला. जरुर या, जरुर या असं तीन चारदा सांगितल्यानंतर मग आम्ही तिथून गेलो. पुढचे दोन दिवस त्याची ड्युटी दुसरीकडे कुठंतरी असावी. कारण नंतर तो आम्हाला भेटला नाही.

पत्रकार मित्र… सानील शा

गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळच्या अनेक पत्रकारांची ओळख झाली होती. त्यापैकी एकाशी चांगली ओळख झाली आणि नंतर त्याचं रुपांतर आमच्या मैत्रीमध्ये झालं. अधूनमधून ईमेल किंवा फोन, एसएमएस अशा स्वरुपात आमचा संपर्क सुरू होता. केरळमध्ये जाताना त्याच्याशी चर्चा करूनच मी प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळं तिरुवनंतपुरम आमच्या प्लॅनिंगमध्ये नसतानाही खास त्याला भेटण्यासाठी सहा तास विनाआरक्षण प्रवास करून तिथं गेलो. ज्याच्यासाठी त्याचं नाव मित्र सानील शा.
सानील हा एकदम मनमौजी. हाडाचा पत्रकार. हाडाचा स्पोर्ट्स रिपोर्टर. केरळा कौमुदी आणि रिपोर्टर टीव्ही अशा केरळमधील दोन प्रथितयश माध्यमांमध्ये काम केल्यानंतर सध्या त्यानं पार्टनरशिपमध्ये न्यूज वेबसाईट सुरू केलीय. वायगान्यूज त्याचं नाव. तमिळनाडूतील एका नदीचं नाव वायगा आहे. वेबसाईटचा आर्थिक दाता हा तमिळनाडूतील असल्यामुळं वेबसाईटचं नाव वायगा न्यूज असं ठेवण्यात आलंय. 
सानीलचं वय तीस ते बत्तीस. मूळचा तो कोच्चीचा. पण नोकरी आणि शिक्षणासाठी तिरुवनंतपुरममध्ये राहतो. नोकरी तर आहेच. पण सध्यात तो विद्यापीठात एम. ए. फिलॉसॉफी (तत्वज्ञान) करतोय. त्यामुळं तिरुवनंतपुरम स्टेशनवरून आम्ही थेट त्याच्या हॉस्टेलवर गेलो. चार तास हॉस्टेल लाइफचा अनुभव घेतल्यानंतर मग आम्ही शहर फिरण्यासाठी बाहेर पडलो. क्रीडा, राजकारण, धर्म, संस्कृती आणि अशा अनेक गोष्टींचा सानीलचा चांगला अभ्यास आहे. अनेक बारीकसारीक गोष्टी त्याला माहिती आहेत. म्हणजे केरळमधील ख्रिश्चन मंडळींचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या चालीरिती, मुस्लिम मंडळींमधील भेदाभेद, हिंदू धर्मातील प्रथापरंपरा, केरळमधील राजकारण अशा गोष्टींची अचूक माहिती त्याला आहे. खाद्यपदार्थ कसे तयार करतात किंवा केरळमध्ये कशा पद्धतीनं पदार्थांमध्ये थोडे थोडे बदल होतात, हे देखील त्यानं मस्त समजावून सांगितलं. अनेक प्रश्नांची नि कोड्यांची उत्तरं मला त्याच्याकडून मिळाली. 


पत्रकार हा तटस्थपणे काम करणारा असला पाहिजे, हे जरी खरं असलं तरीही पत्रकाराला स्वतःचा एक विचार असतो. तसाच सानीललाही त्याचा विचार आहे. तो पूर्णपणे कट्टर डाव्या विचारांचा नसला तरीही डाव्या विचारांना अनुकूल आहे. त्यामुळं त्याच्याशी चर्चा करून डाव्या मंडळींच्या गोष्टी जाणून घेणं हा माझ्यासाठी वेगळा अनुभव ठरला. तुमच्याकडे संघाच्या शाखांवर शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देत नसतील, पण इथं प्रत्येक शाखेवर शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण मिळतं. त्यामुळंच मग ते डाव्या कार्यकर्त्यांवर हल्ले वगैरे करतात, असं तो मला सांगत होता. काँग्रेसनं भरविलेल्या पुस्तक प्रदर्शनातील भाषणाला अवघे सहा लोक होते. त्याचा दाखला देत तो म्हणाला, हेच भाषण जर डाव्यांच्या पुस्तक प्रदर्शनात असतं तर आपल्याला पाय ठेवायला जागा मिळाली नसती. त्याची डावी बाजू मला हळूहळू समजू लागली होती. मधूनच त्यानं मला विचारून घेतलं, की तू संघ विचारांचा आहेस ना. मी संघवाला आहे, हे त्यानं ठरवूनच टाकलं होतं. त्यामुळं माझ्याकडून हो किंवा नाही, या उत्तराची त्याला अपेक्षाच नव्हती.

वायगान्यूज मधून त्याला तूर्त तरी विशेष आर्थिक उत्पन्न मिळत नसलं तरी त्याचे ८० हजार ते एक लाख हिट्स त्याला दिवसाला मिळत आहेत. केरळप्रमाणेच आखाती देशांमधूनही त्याला चांगल्या हिट्स मिळताहेत. त्यामुळे आज ना उद्या ही वेबसाईट हिट होणार, अशा विश्वासावर त्याची वाटचाल सुरू आहे. केरळमध्ये रिपोर्टर, काही नवशिके पत्रकार आणि काही कॉलम रायटर्स यांच्या जोरावर तो गाडा ओढतोय. त्याच्या या धाडसाचं खरं तर मला कौतुक वाटलं. नेहमीची रुळलेली वाट सोडून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, याचा आनंद वाटला. आता त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये छोटेखानी ऑफिसही घेतलंय आणि जोरदार मार्केटिंगही सुरू केलंय.

मलबारी बिर्याणी, पुट्टं आणि सुलेमानी चहा या पदार्थांचा स्वाद त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कळला. भरपूर गप्पा झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते केरळमधील संघाच्या कामापर्यंत अनेक गोष्टींवर. सकाळच्या नाश्त्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटेच्या चहापर्यंतचा वेळ कसा गेला कळलंही नाही. शेवटी त्याला अलविदा केला आणि पहाटे साडेपाचला तिरुवनंतपुरम सोडलं. 

केरळमध्ये खूप फिरलो, खूप काही पाहिलं, खूप काही खाल्लं, खूप काही कॅमेरात साठवलं. तसंच खूप काही मनातही साठवलं. कायम लक्षात राहतील, असे हे चार चेहरे त्यापैकीच.

भोपाळ पार्ट टू... लक्षात राहिलेली माणसं...

तमिळनाडूचे चार प्रतिनिधी
http://ashishchandorkar.blogspot.in/2011/04/blog-post_21.html

पाच वर्षांनंतर... पुन्हा एकदा हैदराबाद 

http://ashishchandorkar.blogspot.in/2012/09/normal-0-false-false-false-en-in-x-none.html

3 comments:

ashishchandorkar said...

हां...माहित्येय..एक माणूस सोडून..तुम्ही बाकिच्यांचीच आगतकौतूक करणार....सहप्रवाश्याविषयी सांगून टाका एकदा..आशिषराव..सोडणार नाही...
Nishikant Todkar ...

राजू सोपान लोंढे. said...

लेखन आवडले

Maharashtra Maza said...

अशी माणसे मिळायलाही नशीब लागते , सहल मस्त अनुभवता येते … छान !